Manoj Jarange Patil High Court Hearing: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील उपोषणासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या मुंबईमधील आंदोलनासंदर्भात सुनावणी सुरु झाली आहे. या सुनावणीत कोर्टाने राज्य सरकारला ३ वाजेपर्यंतचा वेळ दिला असून कारवाई करा अन्यथा तीन वाजता ठोस निर्णय घ्यावा लागेल, असा थेट इशारा दिला आहे.
कोर्टाने काय म्हटलं?
मुंबईमधील मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात हायकोर्टाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आज तीन वाजेपर्यंत कारवाई करुन मुंबई रिकामी करा अन्यथा आम्हाला ठोस निर्णय घ्यावा लागेल असा आदेश हायकोर्टाने सरकारला दिला आहे. हे आंदोलन बेकायदेशीर असून तीन वाजेपर्यंत आम्हाला मुंबई सामान्य हवी आहे .सर्व आंदोलन बेकायदेशीरपणे सुरु आहे. दुपारी मी कोर्टात येताना रस्त्यावर एकही गाडी दिसता कामा नये असे म्हणत कोर्टाने गरज पडल्यास आम्ही तपासणी करु असाही इशारा दिला आहे. याबाबतची सुनावणी पुन्हा तीन वाजता होणार आहे.
"जेव्हा तुम्हाला कळले की ६० हजार ते एक लाख लोक शहरात आले आहेत, तेव्हा तुम्ही काय केले. असा सवाल कोर्टाने सरकारला विचारला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्यांनी काय केले हे देखील राज्य सरकारने सांगावे. मी पाहिले की विमानतळापासून माझ्या घरापर्यंत पोलिसांचे पेट्रोलिंग करणारे वाहनही मला दिसले नाही. मी दोन वाजून ४० मिनिटांनी कोर्टात येऊन तेव्हा मला रस्ते रिकामे झाले पाहिजेत. तीन वाजेपर्यंत आम्हाला शहर सामान्य हवे आहे, अन्यथा आम्ही कोणालातरी पाठवू, अन्यथा आम्ही स्वतः जाऊन पाहू. कारवाई न झाल्यास कोर्टाचा अवमान झाला असं समजू, असा इशाराही यावेळी कोर्टाकडून देण्यात आला आहे.