
मनोज जरांगे पाटील पाटील यांनी मराठा समाजाचा दसरा मेळावा नारायण गडावर आयोजित केला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक उपस्थित राहीले होते. जरांगे यावेळी भावुक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते. यावेळी बोलताना ते मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे असं म्हणत त्यांनी सर्वांनाच एक धक्का दिली. मी जिवंत असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देताना आपल्याला पाहायचे होते. ते स्वप्न आपण मुंबईत जीआर हाती घेवून पूर्ण केलं आहे. त्याचे आपल्याला समाधान असल्याचं ते यावेळी म्हणाले. दोन वर्षा संपूर्ण गरिब मराठा समाजाला आपण आरक्षणात टाकलं आहे असं ही ते यावेळी बोलताना म्हणाले.
भाषणाच्या सुरूवातीलाच जरांगे पाटील यांनी मी थोडा दिवसाचा पाहुणा आहे असं म्हटलं. शरीर आहे काही सांगता येत नाही असं ही सांगत त्यांनी आता आपल्याला तब्बेत साथ देत नाही असे संकेत दिले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. माझ्या गरीबाच्या लेकराचं कल्याण करून द्यायचं होतं. त्यामुळेच मुंबईला चला असं सांगितलं होतं. त्याच वेळी सांगितलं होतं, मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळालेलं पाहायचं आहे. मागे कुणी हटू नका. अशी संधी सोडू नका असं सांगितलं होतं. तुम्ही साथ दिली. 75 वर्षांची लढाई मराठ्यांनी जिंकली. आपण जीआर मिळवला. आता मला चिंता नाही. मी थोडा दिवसाचा पाहूण की लय दिवसाचा याची मला चिंता नाही असं ही ते म्हणाले.
गरिब मराठा समाज होरपळताना बघवत नव्हता. मी कधी नाटक केलं नाही. मी समाजाला कधी खोटं बोललो नाही. समाज तडफडत आहे हे मी पाहात होतो. लेकीबाळीचं दुख पाहवत नव्हतं. सहा कोटी मराठे आता सुखी राहीले पाहीजेत असं आपल्याला वाटत होतं. त्यामुळे कधी शांत बसलो नाही. आरक्षण मिळवलच आहे. आता मला काही वाटत नाही. या आंदोलनात काही जण फीतूर झाले. त्यांनी समजून घ्यावं मी मागे हटलो नाही. मी लढणारा आहे. समाज लढणारा आहे. मी गद्दारी केली नाही. तुमच्याशी गद्दारी करून मोठा झालो असतो पण ते आपल्या रक्तात नाही. आपलं रक्त भेसळ नाही. काही जणांनी फक्त पांढरे कपडे घातले. गाड्यामध्ये फरले. यातच त्यांनी मोठेपण गाजवला. समाजाचं यांना काही नव्हतं. असं म्हणत मराठी पुढाऱ्यांना त्यांनी फटकारलं.
मी आणि माझ्या गरिब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. दोन वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला आहे. आता या पुढे बावचळल्या सारखं वागू नका. सावध रहा. प्रत्येक गोष्ट विचार करून करा. येड्या सारखं वागू नका. हुशार व्हा. मराठ्यांना यापुढे शासक बनायचं आहे. मराठ्यांनी या पुढे प्रशासक पण बनायचं आहे. डोकं लावून आधी शासक बना आणि नंतर आपले प्रशासक बनवा. मग कुणाला काही मागायची गरज लागणार नाही. असं सांगत भविष्यातली मराठा समाजाची वाटचाल काय असेल याचे संकेत त्यांनी या निमित्ताने दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world