
संजय तिवारी, नागपूर: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी, धडाकेबाज भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. नितीन गडकरींच्या थेट, मुद्देसूद आणि सामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या भाषणांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते. सध्या त्यांचे नागपूरमधील एका श्रद्धांजली सभेत केलेले विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले नितीन गडकरी?
'आज अनुकूल काळ आला आहे. काळ बदलला ते दगड मारणारे भाजपमध्ये आले आणि त्यातला एक भाजपचा वार्ड अध्यक्ष झाला,' असे म्हणत नितीन गडकरी यांनी भाजपचे युवा कार्यकर्ते असताना आलेल्या अनुभवाचा एक खास किस्सा सांगितला. नागपूरमध्ये मुंडले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये झालेल्या डॉ रामदास आंबटकर यांच्या श्रद्धांजली सभेत आयोजन करण्यात आले होते.
"ज्या लोकांनी आपल्याकरिता हा विजय मिळवून दिला. त्यांना कधीही विसरू नये. इतिहास बदलत असतो. 1975 मध्ये मी भाजपचे काम करायचो, त्यावेळी आमच्या घरावर येऊन दरवेळी गोटे मारणारी एक मोठी संख्या होती. दरवेळी भाजप नेत्याच्या घरावर आणि संघ कार्यालयावर गोटे मारणारी लोक येत होती. पण आज अनुकूल काळ आला आहे. काळ बदलला ते दगड मारणारे भाजपमध्ये आले आणि त्यातला एक भाजपचा वार्ड अध्यक्ष झाला. आता परिस्थिती बदलली आता सगळे वॉर्ड आमचे झाले. शिव्या देणारे गोटे मारणारे आमचे झाले, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
दरम्यान, पूर्वी अनुकूल नसलेल्या स्थितीत झटणाऱ्या डॉ. रामदास आंबटकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच भाजपला आज चांगले दिवस आले. हे आम्ही विसरायला नको, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी नमूद केले. भाजपचे संघटक तथा माजी आमदार रामदास आंबटकर यांच्या श्रद्धांजली सभेत बोलत होते. यावेळी मंचावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय संघ प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world