
मनोज सातवी
शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहेत. हे चित्र आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या म्हसे गावातलं. शिक्षणासाठी जीवाशी खेळणं म्हणजे काय असतं याचा अनुभव या भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून पाहायला मिळत आहे. टायरच्या ट्यूबवर बसून, वाहत्या नदीतून जीव धोक्यात घालून शाळेत जाण्यासाठी इथल्या चिमुकल्यांचा संघर्ष करावा लागत आहे. पण हे भयाण वास्तव पाहून तुमचं काळीज सुन्न झाल्या शिवाय राहाणार नाही. पण याचे प्रशासनाला मात्र काहीच पडलेलं नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एका टायरच्या ट्यूबवर पाच विद्यार्थी बसतात. त्यांच्या डोक्यावर दप्तर असतं. तर अंगावर पावसाची धार असते. त्यांच्या समोर आहे पिंजाळ नदीचा खवळलेला प्रवाह. म्हसे गावातून ही चिमुकली मुले दररोज असा जीवघेणा प्रवास करत आहेत. वाकी गावातील शाळेत पोहण्यासाठी त्यांना असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पालक टायर ट्यूब नदीपर्यंत घेऊन येतात. त्यानंतर मुले त्यावर बसतात. पुढे त्याच ट्यूबवरून ते नदी पार करत शाळा गाठतात. पुन्हा संध्याकाळी शाळेतून परत घरी येण्यासाठी असचं करावं लागतं. शाळेच्या ड्रेससह सोबत दुसरे कपडे घेऊन येणं, नदी पार करताना पुस्तकं भिजणं – हे सगळं आता या मुलांचं रोजचं आयुष्य झालं आहे.

विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी आता हे रोजचं झालं आहे. शाळा शिकायची आहे. मोठ व्हायचं आहे त्यामुळे म्हसे गावातली मुलं डोळ्यात स्वप्न घेवून शाळा गाठत आहे. संघर्ष हा आपल्या पाचवीला पुजलेलाच आहे हे त्यांनी गृहीत धरलं आहे. या समस्येवर तोडगा काढावा. मुलांना शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता मिळाली ही मागणी अनेक वर्ष केली जात आहे. पण त्याचं कुणालाही सोयर सुतक नाही अशीच स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

दरवर्षी आदिवासी विकासाच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च होतात, पण आजही आरोग्य, शिक्षण आणि पाणी यासाठी मुलांना आणि गावकऱ्यांना ही धडपड करावी लागते. नदीतून हा जीव घेणा प्रवास करून शाळा गाठणं हे किती सुरक्षित आहे. असा प्रश्न उभा राहतो. हे फक्त म्हसे गावाचं नाही, तर संपूर्ण यंत्रणेला जागं करणारा आरसा आहे. एका ट्यूबवर बसलेल्या या मुलांचे चेहरे पाहिले की वाटतं, खरोखर विकास यांच्यापर्यंत पोहोचला आहे का? बरं याची दखल तरी कुणी घेणार आहे का? या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची मागणी काय आहे तर शाळेत जाण्यासाठी एक पुल बनवावा. तो त्याना कधी तरी मिळणार आहे का हाच सवाय या शासनाला हे गावकरी करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world