गेल्या दोन दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची आज जिल्ह्यात सर्वत्र रिपरिप सुरू झाली आहे. गेले दोन दिवस मान्सूनने तळकोकणात पूर्णपणे विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय पालघर, ठाणे, रायगड या भागात पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
धुवांधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल 20 ते 25 मिनिटं उशीराने
धुवांधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल 20 ते 25 मिनिटं उशीराने
कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम लोकल सेवेवर होताना दिसत आहे. धुवांधार पावसामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून लोकल 20 ते 25 मिनिटं उशीराने धावत आहे. 10 वाजून 18 मिनिटांची परेल लोकल 10 वाजून 43 मिनिटं झाली तरी डोंबिवलीत आलीच नसल्याचं दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट
हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट
गेल्या आठवड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. मात्र आठ दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्यांची कापूस आणि सोयाबीनची पिके वाढत्या तापमानाने करपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पिके जगवण्यासाठी ठिबक सिंचनाच्या साहाय्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. दोन दिवसात पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पेरलेल्या पिकांना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देऊन जगवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीवरून ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता
विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता
आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे.
पालघरमध्ये रस्ता पाण्याखाली, मनोर-वाडा महामार्गावरील वाहतूक ठप्प
पालघरमध्ये रस्ता पाण्याखाली, मनोर-वाडा महामार्गावरील वाहतूक ठप्प
पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून देहर्जा नदीवर तात्पुरता बनवलेला रस्ता पाण्याखाली गेला आहे. परिणामी मनोर-वाडा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिक जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने
अनेक वाहने रस्त्यात खोळंबली आहेत.
रायगडावर आज तिथीनुसार 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा
रायगडावर आज तिथीनुसार 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा
आज रायगडावर 351 वा तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. गडावर मोठया स्वरूपात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एकीकडे पावसाची रिमझिम सुरू असताना तेवढ्याच उत्साहात शिवभक्त गडावर दाखल होताना दिसत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला आज यलो अलर्ट, वटपौर्णिमेपासून अतिजोरदार पावसाचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्याला आज यलो अलर्ट, वटपौर्णिमेपासून अतिजोरदार पावसाचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस ओसरलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावली. आजही सकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. आज रत्नागिरी जिल्ह्याला 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काही भागात जोरदार पाऊस, तर काही भागांत अतिवृष्टी होईल अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वटपौर्णिमेपासून अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 22 जूनपर्यंत चांगल्या पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. त्यामुळे अरबी सागरातील मोसमी पावसाची शाखा सक्रिय होईल.
खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर, पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर, पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याचा दौरा करणार आहेत. इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात सुप्रिया सुळे या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.