- संजय शिरसाट यांनी महायुतीतील मित्रपक्षांकडून फोडाफोडीचे राजकारण होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे
- शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अलिखित करार आहे- संजय शिरसाट
- संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर नाराजी व्यक्त केली
महायुतीमध्ये मित्रपक्षांकडूनच फोडाफोडीचे राजकारण होत असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप नेत्यांना 'पैशांची मस्ती' आली असून याचे परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा दिला.
नक्की वाचा: धनंजय मुंडेंना जाणवतेय 'या' आरोपी मित्राची उणीव, जाहीर सभेत नाव न घेता काढली आठवण
अलिखित करार आणि फोडाफोडीचे राजकारण
शिरसाट यांनी म्हटले की, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये 'अलिखित करार' झालेला असतानाही स्थानिक पातळीवर फोडाफोडीचे प्रकार सुरू आहेत. या प्रकाराबद्दल शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "पक्षाचे लोक आपापसात घ्यायचे नाही, असे ठरले असतानाही संभाजीनगरमध्ये काहींना 'पैशांची मस्ती' आली आहे आणि त्या जीवावर फोडाफोडी केली जात आहे," असे ते म्हणाले. या संदर्भातील सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार असून, याचे परिणाम संबंधितांना भोगावे लागतील, असा इशाराच शिरसाट यांनी दिला आहे.
नक्की वाचा: 'प्रचाराला येऊ नका..' तरुणाने घरासमोर लावला 'असा' बॅनर; अख्ख्या जिल्ह्यात चर्चा
संयमाची मर्यादा असते हे लक्षात ठेवा!
महायुतीतील या वर्तनामुळे आपल्या नेत्यांमध्ये नाराजी वाढत आहे आणि संभ्रम निर्माण होत आहे. फुलंब्री, गंगापूर, वैजापूर अशा सर्वच ठिकाणी जर असे प्रकार सुरू असतील, तर महायुती म्हणून आपला नेमका 'रोल' काय आहे, असा प्रश्न संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. "आम्ही वर्चस्व सिद्ध करायला पाऊल उचलले, तर मग वाईट वाटून घेऊ नका. आम्ही संयम पाळला आहे, मात्र तो जास्त काळ टिकणार नाही. संयमाची एक मर्यादा असते," असे म्हणत शिरसाटांनी भाजप नेत्यांना बजावले आहे.
शिवसेना नेत्यांना काही कळेनासे झाले
या फोडाफोडीमुळे एका निवडणुकीचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. "महायुतीमध्ये असे सुरू राहिले, तर निवडणूक लढवता येणार नाही. एक लक्षात ठेवा, ॲक्शनला रिॲक्शन असेल. याबाबत वरिष्ठांनी काळजी घ्यावी," असे स्पष्ट मत शिरसाट यांनी मांडले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर बोलताना, लोक ऑप्शन शोधत असले तरी त्याचा अर्थ त्यांना प्रवेश द्यायचा असा होत नाही, असे शिरसाट म्हणाले. स्थानिक कार्यकर्त्यांची 'मस्ती' आहे की जाणीवपूर्वक हे प्रकार सुरू आहेत, हे कळत नाही असे शिरसाट म्हणाले. अजित पवार यांच्या अंबेजोगाईतील विधानावर, त्यांनी बारामतीपुरतेच बोलले असावे, असा अंदाज व्यक्त करून; इतर नेत्यांबद्दल असे बोलू नये, असा सल्लाही दिला.