सुनील दवंगे, अहिल्यानगर:
Shirdi News: सध्या आपण स्पर्धेच्या युगात जगत आहोत. प्रत्येक क्षेत्रात चढाओढ वाढत असताना, आता ही स्पर्धा थेट देवाच्या प्रसादापर्यंत पोहोचल्याचं चित्र शिर्डीत पाहायला मिळतय. मात्र ही स्पर्धा केवळ विक्रीपुरती मर्यादित नसून, भाविकांच्या आरोग्याशीही खेळ करणारी ठरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
भाविकांच्या श्रद्धेचा बाजार? शिर्डीच्या पेढ्यांमध्ये नियमांचे उल्लंघन!
साईबाबांच्या नगरीत प्रसाद म्हणून पेढ्याला विशेष महत्त्व आहे. एकेकाळी दर्जेदार खवा आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणारा शिर्डीचा पेढा देशभरात प्रसिद्ध होता. मात्र वाढती स्पर्धा, कमी खर्चात अधिक नफा आणि जास्त विक्रीच्या हव्यासापोटी या पेढ्याच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खवा आणि साखरेचे योग्य प्रमाण राखण्याऐवजी काही ठिकाणी साखरेत अत्यल्प प्रमाणात खवा मिसळून पेढे तयार केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी उत्पादनाची तारीख, वजन, किंमत, घटक पदार्थांचे प्रमाण, तसेच अन्न सुरक्षा नियमांनुसार आवश्यक असलेली माहितीही नमूद केली जात नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचा आधार असलेला प्रसादच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडत चालला आहे.
प्रशासनाचा कारवाईचा बडगा
दुसरीकडे, शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. खाण्यास अयोग्य आणि निकृष्ट दर्जाचे पेढे भाविकांना विकले जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर विविध दुकाने आणि विक्रेत्यांकडून पेढ्यांचे नमुने संकलित करण्यात येत आहेत. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार असून अहवालानुसार संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे प्रसाद विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world