Solapur Crime: पत्नी माहेरी गेल्याच्या वियोगाने खचलेल्या जन्मदात्या पित्याने तीन मुलींना विष पाजून स्वतःही आयुष्य संपवल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात घडली आहे. यामध्ये भीमा अण्णा वाघमारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तिन्ही मुलींची प्रकृती गंभीर आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजून स्वतः आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिर्थ गावात ही भयंकर घटना घडली. भीमा अण्णा वाघमारे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून प्रगती, प्रतिक आणि प्रतिक्षा अशी उपचार सुरु असलेल्या मुलींची नावे आहेत. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
भीमा वाघमारे हे एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. भीमा वाघमारे आणि त्यांच्या पत्नीत गेल्या अनेक दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते. याच वादातून पत्नीने माहेरी निघून गेली होती. भीमा वाघमारे यांनी आणि नातेवाईकांनी पत्नीचे समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने सासरी येण्यास नकार दिला.
याच निराशातून भीमा वाघमारे यांनी आपल्या प्रगती (वय, 8) प्रतिक (वय, ६) आणि प्रतीक्षा (वय, 4) यांना वळसंग जवळील शेतात घेऊन गेले होते. त्याठिकाणाहून त्यांनी पत्नीला फोन केला मी आता निघालो, तू मुलांना घेऊन जा, असं सांगितले आणि तिन्ही मुलांना विष दिले, तसेच स्वतःही प्राशन केले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे घटना पाहताच शेजारी शिवराज कुंभारी यांनी तातडीने तिन्ही मुलांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world