- अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीत जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप
- या प्रकरणात व्यावसायिक आणि राजकीय षडयंत्राची शक्यता व्यक्त केली आहे
- रोहित पवार यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचा राजिनामा मागितला आहे
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणात व्यावसायिक आणि राजकीय अशा दोन्ही स्तरावर षडयंत्र असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. केंद्र सरकार, डीजीसीए (DGCA) आणि व्हीएसआर (VSR) एअरलाईन्सवर प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली आहे. त्यांच्या नव्या मांडणी मुळे अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय अजून बळावला आहे. हे सांगत असताना आरोपींना कोण वाचवत आहे असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रोहित पवार म्हणाले की, "अजित दादांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी अत्यंत चांगले संबंध होते. त्यामुळे या प्रकरणात आता केवळ पंतप्रधान आणि गृहमंत्रीच न्याय देऊ शकतात." या संदर्भात ते पंतप्रधानांना पत्रही लिहिणार आहेत. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा, अशी संपूर्ण महाराष्ट्राची भावना असल्याचे रोहित यांनी नमूद केले. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी पहिल्याच दिवशी संबंधित कंपनीला क्लीन चिट कशी दिली? असा सवाल करत रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
कोणती ही चौकशी न होता अशी पद्धतीची क्लिनचिट कशी दिली जावू शकते असा प्रश्न ही त्यांनी केला. शिवाय रोहित पवार यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. टीडीपी (TDP) नेत्यांच्या निकटवर्तीयांकडून व्हीएसआर कंपनीला अर्थपुरवठा होत असल्याचा खळबळजनक दावाही रोहित पवारांनी केला आहे. विमानातील इंधन, वैमानिकाचा बदल आणि डीजीसीएची भूमिका यावर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
रोहित पवार यांनी सांगितले की, या प्रकरणात प्रश्न विचारू लागताच त्यांना ट्रोल केले जात असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. "विमानात आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन का भरले होते? शेवटच्या क्षणी वैमानिक का बदलला?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. व्हीएसआर कंपनी आपले व्यवहार परदेशात हलवण्याच्या तयारीत असून आजही या कंपनीची विमाने उडत आहेत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
हा केवळ अपघात नसून राजकीय आणि व्यावसायिक हितसंबंधांतून रचलेले षडयंत्र असू शकते, अशी भीती रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. प्राथमिक अहवाल येण्यास होणारा उशीर हा संशयाला जागा देणारा असल्याचे सांगत, त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्या पक्षाचे आहेत, त्याच पक्षाच्या नेत्यांचे हितसंबंध कंपनीशी जोडलेले असल्याने तपास निष्पक्ष होऊ शकत नाही, असा दावा रोहित पवारांनी केला. त्यांनी या प्रकरणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून महाराष्ट्राला सत्य सांगावे, अशी विनंती केली आहे. व्हीएसआर कंपनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत असूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world