जाहिरात

Ravindra Chavan: भाजपला 46 वर्षे पूर्ण, रविंद्र चव्हाणांचं मोठं विधान, म्हणाले, "त्यांच्या रक्ता-घामाने.."

"विचारधारेच्या घट्ट मुळांनी मातीत रुजलेला आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला भारतीय जनता पक्षाचा विशाल वटवृक्ष आज ४७व्या वर्षात पदार्पण करत आहे"

Ravindra Chavan:  भाजपला 46 वर्षे पूर्ण, रविंद्र चव्हाणांचं मोठं विधान, म्हणाले,  "त्यांच्या रक्ता-घामाने.."
Ravindra Chavan Statement On BJP Party
मुंबई:

Ravindra Chavan On BJP : सोमवारी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आहे.६ एप्रिल १९८० रोजी पक्षाची स्थापना झाली.पक्षाने ४६ वर्षे पूर्ण करून ४७व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लेख लिहून आपले विचार मांडले आहेत.सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा प्रवास फक्त भाजपसारख्या संघटनेतच शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.त्यांनी पुढे लिहिले की,विचारधारेच्या घट्ट मुळांनी मातीत रुजलेला आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला भारतीय जनता पक्षाचा विशाल वटवृक्ष आज ४७व्या वर्षात पदार्पण करत आहे.६ एप्रिल १९८० रोजी रोवलेले हे बीज आज सुमारे २५ कोटींहून अधिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीने संपूर्ण देशभर विस्तारले आहे.

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की,भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता,भाजयुमोचा उपाध्यक्ष,नगरसेवक,आमदार,कॅबिनेट मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष या नात्याने जेव्हा मी पक्षाच्या इतिहासाकडे पाहतो,तेव्हा मला जाणवतं की जसे विचारधारेने एक एक कार्यकर्ते घडवले आणि त्याचप्रमाणे असंख्य ध्येयवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या रक्ता-घामाने गुरुदक्षिणा म्हणून पक्षाला घडवले.जेव्हा नेहरू-गांधींची अल्पसंख्याक-केंद्रित समाजवादी विचारसरणी आणि साम्यवादी चळवळींचा जागतिक प्रभाव होता,त्या काळात जनसंघाच्या माध्यमातून बहुसंख्य पण वंचित समाजाला केंद्रस्थानी ठेवण्याचे आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे धैर्य डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी,पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या नेत्यांनी दाखवले.त्यांची दूरदृष्टी आजही आमच्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात कार खरेदी करताना सावध राहा, ग्राहकांची होतेय फसवणूक; पोलिसांनी चाकणमध्ये टोळीला पकडलं

भाजपच्या या प्रवासात अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान

वैचारिक पाया आणि नेतृत्वाची परंपरा लाभलेल्या भाजपच्या या प्रवासात अनेक ऋषितुल्य नेत्यांचे मोठे योगदान राहिले आहे.महाराष्ट्र भाजपाचाच विचार करायचा झाला तर १९८० मध्ये उत्तमराव पाटील यांनी पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचा पाया रचला.त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला गावागावात नेले आणि बहुजन व ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.१९९५ मध्ये काँग्रेसची सत्ता हटवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. प्रा.ना.स.फरांदे यांनी पक्षाला वैचारिक बळ दिले, तर सूर्यभान वहाडणे पाटील यांनी शिस्तबद्ध नेतृत्वातून संघटना मजबूत केली.भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकऱ्यांसाठी लढा देत पक्षाला शेतशिवारापर्यंत पोहोचवले. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना सावरत संघटनेला नवी ऊर्जा दिली.

सुधीर मुनगंटीवार यांनी जनसंपर्काचा नवा अध्याय सुरू केला.२०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठी झेप घेतली आणि प्रदेशाध्यक्षपदावरून थेट मुख्यमंत्रीपदावर जाण्याचा अनोखा विक्रम घडला.त्यानंतर रावसाहेब दानवे,चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटना आणि सरकार यांच्यात उत्तम समन्वय साधत पक्षाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले.

नक्की वाचा >> Video: 'सर्व पुरुष एकसारखे...', रात्री 3 वाजता घडलेल्या प्रसंगाबाबत तरुणीनं सर्वच सांगितलं, " 2 अज्ञातांनी.."

जातीय राजकारणाला भाजपचे ठाम प्रत्युत्तर

कधी ‘शेटजी-भटजी'ची पार्टी म्हणून टीका झालेल्या भाजपने ४६ वर्षांत महाराष्ट्रात ११ बहुजन समाजातील प्रदेशाध्यक्ष दिले,जे जातीय राजकारण करणाऱ्यांना ठोस उत्तर आहे.आज एक कार्यकर्ता म्हणून प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सांभाळताना,मला अभिमान वाटतो की सामान्य कार्यकर्त्यापासून या पदापर्यंत पोहोचणे केवळ भाजपातच शक्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील यश हे केवळ आकडे नसून जनतेचा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

'भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व' हा विचार तळागाळात

भाजप ही केवळ बॅनर आणि सभांची संघटना नसून विचारधारेवर उभे असलेले कार्यकर्ते हीच तिची खरी ताकद आहे.‘भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व' हा विचार आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवला आहे.आम्हाला अनेकदा अति राष्ट्रवादी म्हटले जाते; पण देशाबद्दल अभिमान बाळगणे हा दोष असेल, तर तो आम्ही आनंदाने स्वीकारू.‘राष्ट्र प्रथम'ही आमच्या विचारधारेची मूळ भूमिका आहे.काळानुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करत भाजप एक ‘टेक-फ्रेंडली' संघटना बनत आहे.ज्यामुळे बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांशी तात्काळ संपर्क साधणे शक्य झाले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे आणि त्यात महाराष्ट्राचा १ ट्रिलियन डॉलरचा वाटा सुनिश्चित करणे, यावर विशेष भर दिला जात आहे. या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि गावपातळीवरील समस्या शासनापर्यंत नेणे, हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. हाच ‘अंत्योदय'चा खरा अर्थ आहे. जेव्हा प्रत्येक भाजप कार्यकर्ता या भावनेने काम करेल,तेव्हाच ‘विकसित भारत'चे स्वप्न साकार होईल आणि विकसित महाराष्ट्राशिवाय ते शक्य नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com