
महायुतीत सर्व काही ठिक चाललं आहे असं नाही. रोज महायुतीत काही ना काही कारणावरून खटके उडताना दिसत आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे. यात भाजपच्या मंत्र्यानेच शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला झापलं आहे. ऐवढचं नाही तर आमच्याकडे 237 आमदार आहेत. ज्यांना युतीत राहायचंय त्यांनी राहावं, नाही तर बाहेर पडावं अशा शब्दात सुनावलं आहे. विशेष म्हणजे या मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या दोन आमदारांनी ही तक्रार केली होती. तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांने त्यांना पत्र लिहीत खडेबोल सुनावले होते. त्याचा रागचं या मंत्रिमहोदयांनी व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हे प्रकरण आहे जालना जिल्ह्यातील. तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपा बाबत नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या तीन आमदारांनी मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी जो निधी वाटप केला होता त्याला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. सावे यांना हा झटका समजला जात आहे. ज्या आमदारांनी तक्रार केली होती त्यात दोन आमदार हे त्यांच्याच पक्षाचे म्हणजे भाजपचे आहेत. भाजपचे मुखेड मतदार संघातील आमदार तुषार राठोड, किनवटचे आमदार भीमराव केराम यांचा समावेश आहे.
या शिवाय हदगावचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हा सावे यांची तक्रार केली आहे. कोहळीकर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. बाबुराव कोहळीकर यांनी तर थेट पालकमंत्री अतुल सावे यांना या प्रकरणी एक पत्र लिहीले आहे. हे पत्र खरमरीत आहे. त्यात त्यांनी थेट पालकमंत्र्यांनाच इशारा दिला आहे. त्या पत्रात आरोप करताना ते म्हणतात, आपण सुचवलेली तांडा वस्ती सुधार योजनेच्या कामाना मंजुरी न देता, विरोधी लोकांची कामे मंजूर केली. हा लोकप्रतिनिधींचा अपमान आहे. याबाबत तुमच्या दौऱ्या दरम्यान आपण आपल्या असंख्या कार्यकर्त्यांसह तुम्हाला जाब विचारू. याची गांभिर्याने नोंद घ्यावी असा शिवसेना स्टाईल इशाराच त्यांनी भाजप मंत्र्यांना दिला आहे.
दरम्यान त्यांच्या या इशाऱ्याला सावे यांनीही जशाच तसे उत्तर दिले आहे. ज्या पद्धतीने कोहळीकर यांनी पत्र लिहीले आहे ते पाहन ते चांगलेच संतापले आहेत. मी याची खूप काळजी करत नाही, पाच वर्ष आमच्याकडे 237 आमदार आहेत. आम्ही युतीत काम करतो. ज्याला युतीमध्ये राहायचे आहे त्यांनी रहावं, ज्याला युतीमध्ये राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावे असा पलटवार अतुल सावे यांनी शिवसेना आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यावर केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Rane vs Rane: 'राणे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार' माजी खासदार असं का बोलले?
शिवसेना शिंदे गट सध्या महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय निधी बरोबरच कामांच्या मंजूरीबाबतही तक्रारी केल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे ही नाराज असल्याचं बोललं जातं. पण राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी स्थिती झाल्याची राजकीय चर्चा आहे. त्यामुळेच की काय फडणवीसांच्या जवळचे समजले जाणारे सावे हे थेट बोलून गेले. शिवाय यातून त्यांनी युतीत राहायचे असेल तर राहा नाही तर बाहेर पडा, काही फरक पडत नाही असा इशारा तर शिंदे गटाला एक प्रकारे दिलेला नाही ना? याची ही चर्चा आता राजकीय वर्तूळात रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world