
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे सध्या सीडी स्कँडलवरुन एकमेकांवर तुटून पडले आहेत. हे कमी होतं की काय, तोच पुन्हा एका जुन्या मुद्द्यावरुन या दोघांमध्ये नव्यानं वाद सुरू झाला आहे. हा नवा वाद आहे निखील खडसेंचा मृत्यू नेमका कसा झाला. निखिल खडसे हा एकनाथ खडसेंचा एकुलता एक मुलगा. 2013 मध्ये निखिल खडसे यांनी आत्महत्या केली. मात्र निखिल खडसेंची ही आत्महत्या होती की हत्या, असा सवाल गिरीश महाजनांनी केला आहे. त्यासाठी महाजनांनी दाखला दिलाय प्रफुल्ल लोढा याचा. निखिल खडसेंचा मृत्यू झाला त्यावेळी ती हत्या की आत्महत्या असा सवाल प्रफुल्ल लोढानं केल्याचा दावा गिरीश महाजनांनी केला आहे. तर मुलाच्या मृत्यूवरुन राजकारण सुरू झाल्यानं खडसे चांगलेच चिडले आहेत. मुलाच्या मृत्यूवरून इशारे कसले देता, दम असेल तर चौकशी करा, असं आव्हान खडसेंनी दिला आहे.
1 मे 2013 ला निखिल खडसे यांचा मृत्यू झाला होता. निखिल खडसे हा एकनाथ खडसेंचा मुलगा आणि रक्षा खडसे यांचे पती होते. 1 मे 2013 ला निखिल खडसे सकाळी बाहेर गेले होते. निखिल दुपारी घरी परतले. त्यावेळी घरी निखिल यांची आई मंदाताई खडसे आणि पत्नी रक्षा खडसे होत्या. एकनाथ खडसे त्यावेळी जळगावातच एका कार्यकर्त्याच्या घरी लग्नसमारंभासाठी गेले होते. निखिल दुपारी त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर त्या खोलीतून गोळ्या झाडल्याचा आवाज आला. खडसे कुटुंबीय निखील यांच्या खोलीत धावत गेले. त्यावेळी निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?
निखील यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचं सांगण्यात येतं. ही माहिती मिळताच एकनाथ खडसे तातडीनं घरी पोहोचले. निखील खडसेंना जळगावात हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र गोळी थेट मेंदूला लागल्यानं निखिल यांचा मृत्यू झाला होता. निखील खडसेंनी स्वतःला राजकारणात आजमावण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र त्यांची राजकारणात यायची फारशी इच्छा नव्हती. आईच्या आग्रहामुळे निखिल खडसे राजकारणात आल्याची चर्चा होती. निखिल खडसे जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य होते. 2009 मध्ये विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी निखिल खडसेंचा पराभव केला होता.
स्थानिक राजकारणात खडसे कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतरही भाजपनं युवा मोर्चा जळगाव जिल्हा उपाध्यक्षपद निखिल खडसेंना दिलं होतं. मात्र राजकारणातल्या अपयशामुळे निखिल खडसेंनी आत्महत्या केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. तसंच निखिल हे आत्महत्येआधी काही काळ पाठ आणि मानेच्या दुखण्यानं त्रस्त होते. त्या आजारपणाच्या नैराश्यातून खडसेंनी आत्महत्या केल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती. 2022 मध्ये एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांबद्दल एक विधान केलं होतं. खडसे म्हणाले होते, दुर्दैवानं गिरीश महाजनांना मुलगा नाही, नाही तर तोही राजकारणात आला असता. खडसे-महाजन यांच्यातून विस्तवही जात नाही. मात्र ज्यावेळी हे आरोप मुला-बाळांपर्यंत जातात, त्यावेळी राजकारण अत्यंत खालच्या थराला जातं आणि जिव्हारी लागतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world