गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Sanjay Raut: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या दररोज अनेक ठिणग्या उडत असतानाच, एका अत्यंत अनपेक्षित घटनेने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. जे दोन नेते एकमेकांचे तोंड पाहणेही पसंत करत नाहीत आणि ज्यांच्यामध्ये नेहमीच शेलक्या शब्दांत युद्ध रंगात असते, त्यापैकी एका नेत्याने चक्क दुसऱ्या नेत्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. नेहमी आगपाखड करणाऱ्या आपल्या सर्वात कट्टर विरोधकाला चक्क राज्यातील एक 'उत्तम मंत्री' म्हणून गौरवल्याने राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीवरून सुरू झालेल्या एका वादात अचानक हे असे काय घडले, ज्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन नेत्यांकडे वेधले गेले आहे, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपाचे नेते तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. नितेश राणे हे नेहमीच संजय राऊत यांच्यावर अत्यंत टोकदार आणि शेलक्या भाषेत टीका करत असतात. मात्र, यावेळेस संजय राऊत यांनी पलटवार न करता चक्क नितेश राणे यांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.
राज्यातील उत्तम काम करणाऱ्या मंत्र्यांमध्ये नितेश राणे यांचा समावेश होतो, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.
गिफ्टच्या राजकारणातून झाली सुरुवात
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका अजब गिफ्टमुळे झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीतील घोडेबाजारावरून संजय राऊत यांनी भाजपाला चांगलेच धारेवर धरले होते. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून नितेश राणे यांनी संजय राऊत यांना थेट 'बरनॉल'चे पार्सल पाठवून डिवचण्याचा प्रयत्न केला होता.
या गिफ्टबाबत जेव्हा पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले, तेव्हा त्यांनी संतापण्याऐवजी अत्यंत शांतपणे उत्तर दिले. मी त्यांना कोणतेही रिटर्न गिफ्ट पाठवणार नाही, उलट त्यांनी दिलेल्या गिफ्टचा स्वीकार करून ते गरजू रुग्णांना पाठवेन, असा टोला त्यांनी लगावला. सोबतच, नितेश राणेंनी स्वतःकडे बरनॉल का ठेवले होते? ते काय जखमी झाले होते का? असा मिश्कील चिमटाही त्यांनी काढला.
सत्तेचा सल्ला आणि खात्याच्या कामाचे कौतुक
संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी नितेश राणे यांना थेट सल्ला देत त्यांच्या कामाची पावतीच देऊन टाकली. नितेश राणे हे तरुण मंत्री असून त्यांचे कुटुंब मूळचे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील आहे, याची आठवण राऊत यांनी करून दिली.
सत्ता कधीच अमर नसते, ती येते आणि जाते, त्यामुळे आपल्या खात्याकडे अधिक लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी दिला. नितेश राणे यांच्याकडे असलेले मत्स्य विभाग हे अत्यंत महत्त्वाचे खाते असून ते हे काम उत्तमरीत्या सांभाळत आहेत आणि त्यांनी चांगल्या योजना आणल्या आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी पहिल्यांदाच त्यांच्या पारंपरिक विरोधकाचे जाहीर कौतुक केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world