
मराठी भाषेबाबत राज ठाकरे आक्रमक झाले आहे. मनसेनंतर संपूर्ण राज्यात मोहीमच आखली आहे. हिंदीला पहिलीपासून शिकवण्याला मनसेचा विरोध आहे. त्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय ही मागे घ्यायला लावण्यास भाग पाडले. त्या विरोधात उत्तर भारतीय नेते ही राज ठाकरे यांच्या विरोधात समोर आले होते. त्यात भाजप खासदार निशिकांत दुबे हे आघाडीवर होते. त्यांनी मराठी माणसाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आपटून आपटून मारू, आमच्या पैशांवर तुम्ही जगता असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा निषेध झाला. पण लोकसभेत काँग्रेसच्या महिला खासदारांनी त्यांना याचा थेट जाब विचारला. याचा राज ठाकरे यांनी कौतूक केलं आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना एक पत्र लिहून कौतूकाची थाप दिली आहे.
त्या पत्रात ते लिहीतात, मराठी माणसांना आपटून आपटून मारू, अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत डुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात. त्याला जाब विचारलात याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, त्यावर हल्ली सर्रास अन्याय होत असताना, संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं, त्याला तुम्ही या कृतीने छेद दिलात. याबद्दल बरंच मनापासून आभार. असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
नक्की वाचा - Rajnath Singh: 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण
महाराष्ट्राला सध्या 'व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासलेलं आहे. माझ्या मते हा उभाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्राने देशाचा विचार केला पाहिजे हे खरे आहे. कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली जी काही मोजकी राज्य आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहोत, मराठी जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, त्यामुळे या जनतेप्रती, या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे, याचा विसर पडायला लागला आहे. यामुळेच सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या, आणि 1857 चा उठाव असू दे की पुढचा स्वातंत्र्यलढ्याला आकार देणाऱ्यात मरहट्टे होते याचा आपल्याला विसर पडतो.
म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे, आणि तुम्ही ती दाखवलीत याबद्दल मनापासून आभार. महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का बसले माहित नाही, पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस या समोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world