
अभिषेक भटपल्लीवार
राहुल गांधींच्या आरोपानंतर राजुऱ्यात धुरळा उडाला आहे. राजुरात विधानसभा निवडणुकीत जवळपास 6850 मतं वाढली आहेत. त्यामुळे राजुऱ्यात नेमकं काय घडलं याची चर्चा जोरदार पणे होत आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत चंद्रपुर जिल्ह्तातील राजुरा विधानसभा मतदार संघाचे उदाहरण देत वातावरण तापवलं होतं. राहुल गांधींचा दावा आहे राजुऱ्यात 6850 नवी नावं वाढवली. शिवाय तिथे नावंही चुकीची दाखवली गेली. JWJW अशी मतदारांची नावं लिहीण्यात आली होती असं ही राहुल यांनी सांगितली.
राजुरा मतदारसंघ हा चंद्रपूर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. राजकीय दृष्टीकोनातून संवेदनशील आणि चुरशीचा मतदारसंघ म्हणून त्याकडे पाहिलं जातं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजुऱ्यामध्ये भाजपचे देवराव भोंगळे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे जेष्ठ आमदार सुभाष धोटे यांचा 3,054 मतांनी पराभव केला. हा निकाल तुलनात्मकदृष्ट्या कमी मताधिक्याने लागला होता. 2019मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे सुभाष धोटे विजयी झाले होते. तर 2014 मध्ये भाजपचे संजय धोटे जिंकले होते. निकालानंतर पराभवाचे विश्लेषण करताना धोटे यांना अनेक गंभीर बाबी समोर आणल्या. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात 18 हजार मते वाढली होती. एवढी माते कशी वाढली असा संशय आल्याने धोटे यांनी निवडणुकीपूर्वी तक्रार केली. त्यावरून सहा हजार मते आयोगाने कमी केली. उरलेल्या अकरा हजार मतांमध्येही बोगस मतदार असल्याचा आरोप धोटे यांचा आहे. कर्नाटकात काँग्रेसची मते वगळण्यात आली, तर राजुरा येथे भाजपने बोगस मतदार वाढवले, असा त्यांचा आरोप आहे.
राहुल गांधी जो दावा करतायत, त्यानुसार राजुरामध्ये खरंच मतदार वाढले होते का? ते ही पाहणे गरजेचे आहे. लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदार संघात 55 हजार मतदारांची वाढ झाली. राजुरा मतदारसंघात 1 ऑक्टोबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 दरम्यान 11 हजार 667 ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी झाली होती. यासंदर्भात काँग्रेसचे पराभूत सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 6 हजर 853 मते डिलिट करण्यात आली. आता राहुल गांधींनी राजुऱ्यामध्ये केलेल्या मतदानवाढीच्या आरोपामुळे तिथले काँग्रेसचे पराभूत सुभाष धोटेही नव्यानं मैदानात उतरले आहेत.
निवडणुकीपूर्वीच आपण बोगस मतदारांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर राजुऱ्याचे भाजप आमदार देवराव भोंगळेंनी मात्र राहुल गांधी आणि सुभाष धोटेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. ही मतदार वाढ नैसर्गिक असल्याचा त्यांचा दावा भाजप आमदार देवराव भोंगळेंनी केला आहे. राजुऱ्यामध्ये 2014 आणि 2024 मध्ये भाजपचा आमदार झाला असला तरी काँग्रेसचा हा पारंपारिक मतदारसंघ राहीला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतांमध्ये घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते निवडणुकी आधीपासून करत आहेत. आता राहुल गांधींनी राजुऱ्याचा उल्लेख प्रेझेंटेशनमध्ये केल्यामुळे काँग्रेसच्या राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना आणखी बळ मिळालं आहे.राजुऱ्यातल्या मतदार घोळाबद्दल आधीच तक्रार दाखल आहे. मात्र 11 महिन्यांत त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आता तरी कारवाईची चक्रं फिरणार का याची उत्सुकता आहे.
राजुरा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या व मतदान केंद्रे
- नोंदणीकृत मतदार : 3,15,073
- पुरुष मतदार : 1,59,821
- महिला मतदार : 1,55,252
- मतदान केंद्रे : 344
राजुरा विधानसभा निकाल
2024
- देवराव भोगले (भाजप) विजयी एकूण मते = 72,882 वि. सुभाष धोटे (काँग्रेस) पराभूत = एकूण मते - 69,828
2019
- सुभाष धोटे (काँग्रेस) विजयी एकूण मते =. 60,228 वि. वामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष) = एकूण मते - 57,727
2014
- संजय धोटे (भाजप) विजयी एकूण मते =. 66,223 वि. सुभाष धोटे (काँग्रेस) पराभूत = एकूण मते - 63,945
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world