- शरद पवारांनी यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे
- अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षातील वाद वाढले असून शरद पवार सक्रिय झाले आहेत
- महाविकास आघाडीतील विरोधकांकडे राज्यसभा निवडणुकीसाठी 46 आमदार आहेत
शरद पवार यांनी आपण या पुढे कोणती ही निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट केले होते. राज्यसभेची ही टर्म आपली शेवटची टर्म आहे असं ही त्यांनी जाहीर केलं होतं. पण पवारांबाबतचा अनुभव पाहाता, ते जे बोलतात त्याच्या अगदी उलटं त्यांच्या मनात सुरू असतं. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. त्यांनी यंदाची राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या संदर्भात सूतोवाच केले आहे. राष्ट्रवादीच्या गोटातूनही याला दुजोरा मिळत आहे. 85 वर्षांच्या शरद पवारांनी यापूर्वी प्रकृती आणि वयाचे कारण देत निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते, मात्र आता ही व्यूहरचना बदलल्याचे दिसत आहे.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण 12 फेब्रुवारी रोजी होईल आणि पवार राजकारणातून निवृत्ती घेतील, अशी चर्चा होती. मात्र, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर सर्वच समीकरणे बदलली आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. रोहित पवार यांनीही अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केल्याने दोन्ही गटांतील दरी वाढली आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांनी सक्रिय राहणे पक्षासाठी अनिवार्य मानले जात आहे.
सध्या महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत. त्यात ठाकरे गट 20, काँग्रेस 16 आणि शरद पवार गट 10 आमदार असं संख्याबळ आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी 37 मतांची गरज आहे. जर विरोधकांनी एकत्रितपणे पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, तर त्यांची निवड सुकर होऊ शकते. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे. एनडीएकडे 228 आमदार असल्याने ते 6 जागा सहज जिंकू शकतात. मात्र, सातव्या जागेसाठी विरोधकांकडे 46 मते आहेत. शरद पवारांसारखा अनुभवी नेता उमेदवार असल्यास ही जागा जिंकणे विरोधकांसाठी सोपे जाईल.
वयाचा विचार न करता संघर्षाला प्राधान्य देणाऱ्या पवारांचा हा 'पावर प्ले' यशस्वी होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर शरद पवार विरोधात ठाम राहिले. कुटुंबातील मोठ्या व्यक्तीच्या नात्याने या कठीण काळात पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांनी सक्रिय राहणे गरजेचे आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि बदललेली राजकीय परिस्थिती पाहता, शरद पवार आता शेवटपर्यंत लढण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार यांच्याकडे स्वतःचे केवळ 10 आमदार असले तरी, महाविकास आघाडीतील इतर पक्ष त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहेत. सुप्रिया सुले यांनीही यापूर्वी बिनविरोध निवडीचे संकेत दिले होते. त्यामुळे 'साहेब' पुन्हा एकदा संसदेत गर्जणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world