
अमजद खान
कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेत सध्या फुट पडली आहे. त्यामुळे भाजपची ताकदी ही कल्याण डोंबिवलीत वाढली आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणूकीच्या आधी शिवसेना भाजपमध्ये धूसफूस सुरु झाली आहे. एका वाचनालयावर फक्त शिवसेना शिंदे गट नेत्यांच्या फोटो असल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाने युती धर्म पाळत नसल्याची टिका केली होती. दुसरीकडे शिवसेनेच्या एका ग्रुपवर मंदार टावरे यांच्या कार्यक्रमाचा फोटो व्हायरल केला आहे. शिवसेना भाजप यांच्यातील या धुसफूसीवर आता ठाकरे गटाने चिमटा काढला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाकित केले आहे की, महापालिका निवडणूकीपर्यंत युती राहणार नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील समिकरणं बदलण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजप युतीत कधीही आलबेल नव्हते. महापालिका निवडणूक 2015 ला झाली. त्यावेळी युती नव्हती. निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेना भाजपएकत्रित आले. मात्र या दोन्ही पक्षात महासभेत आरोप प्रत्यारोप सुरुच होते. एक वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडूकीत हे दोन्ही पक्ष एकत्रित आले. एकमेकांच्या उमेदवारांना निवडून ही आणले.
ट्रेंडिंग बातमी - MNS Rada: चप्पल फेकली, झिंज्या ओढल्या, कानशिलात लगावली, महिलांची 'मनसे' दे दणा दण
परंतू अंतर्गत कलह कमी झालेला नाही. सध्या डोबिवली सुनिलनगर परिसरात एका वाचनालयाच्या फलकावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो असल्याने भाजपच्या माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी फेसबूक पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये त्यांनी शिवसेना युती धर्म पाळत नसल्याचे म्हटले आहे. यातून त्यांनी युतीबाबतच प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे एका शाळेच्या कार्यक्रमाचा फोटो शिवसेनेकडून व्हायरल केला आहे.
त्यात शिवसेना शिंदे गटाने आरोप केला आहे की, भाजपच्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते दिसत नाहीत. याचा अर्थ असा आहे की ते युतीत आहेत की नाही असा प्रकार सुरु आहे. यावरुन ठाकरे गटाने चिमटा काढला आहे. जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी टिका केली आहे की, लोकसभेपासूनच दोन्ही पक्षांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची धुसफूस सुरू आहे. आपण बघितले असेल तर विधानसभेच्या निवडणुकीला देखील भाजप आणि शिंदे गटांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद झाल्याची चर्चा लोकांमध्ये आहे.
या चर्चेमुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये सख्य राहिलेलं नाही. दोघांमध्ये धुसफूस सुरू आहे. ती येत्या महापालिकेच्या निवडणुकीला भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आलेला दिसेल असं ही ते म्हणाले. शिवाय जनतेला ही आता या दोन्ही पक्षाचा खरा चेहरा कळला आहे. हे आधी भांडण करतात नंतर ते एकत्र येतात असं ही म्हात्रे यावेळी म्हणाले. त्यामुळे ठाकरे शिवसेना हाच सक्षम पर्याय असल्याचा दावा त्यांनी या निमित्ताने केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world