जाहिरात

T20 Captaincy: सूर्याचे कर्णधारपद धोक्यात? 'हे' 5 खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत, BCCI मोठा निर्णय घेणार

भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या खराब फॉर्ममुळे त्याचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. 2025 मध्ये सूर्याची फलंदाजीची सरासरी 14 च्या खाली घसरल्याने बीसीसीआय आता नव्या पर्यायांचा विचार करत आहे.

T20 Captaincy: सूर्याचे कर्णधारपद धोक्यात? 'हे' 5 खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत, BCCI मोठा निर्णय घेणार

भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये जगातील नंबर 1 फलंदाज मानल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादव याच्या कर्णधारपदावर आता टांगती तलवार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्याच्या फलंदाजीतील सातत्य कमी झाल्यामुळे बोर्ड त्याच्या नेतृत्वाचे पुनरावलोकन करणार आहे. विशेषतः 2028 च्या टी-20 विश्वचषकासाठी दीर्घकालीन नियोजनाच्या दृष्टीने बोर्डाने आतापासूनच नव्या कर्णधाराचा शोध सुरू केला आहे.

सूर्याचं कर्णधारपद धोक्यात का?

सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून संघाला विजय मिळवून दिले असले तरी, वैयक्तिक कामगिरीत तो अपयशी ठरत आहे. 2025 मध्ये सूर्याची फलंदाजीची सरासरी 14 पेक्षाही कमी राहिली आहे. विश्वचषकात मोठ्या संघांविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात सूर्याला अपयश आले. 2028 च्या विश्वचषकापर्यंत सूर्या 38 वर्षांचा होईल, त्यामुळे बोर्ड तरुण नेतृत्वाकडे वळण्याच्या तयारीत आहे.

कर्णधारपदाच्या शर्यतीत कोण? 

श्रेयस अय्यर 

श्रेयस अय्यर सध्या सूर्यकुमार यादवचा सर्वात प्रबळ पर्याय मानला जात आहे. पंजाब किंग्सला आयपीएल फायनलमध्ये नेणारा आणि मुंबईसाठी विजय हजारे ट्रॉफी जिंकणारा अय्यर एक चतुर कर्णधार म्हणून ओळखला जातो. तो सूर्याच्या जागी नंबर 4 वर फलंदाजीसाठीही योग्य आहे.

संजू सॅमसन 

टी-20 विश्वचषकातील ऐतिहासिक कामगिरीनंतर सॅमसनचा दावा मजबूत झाला आहे. 31 वर्षीय सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सच्या कप्तानीचा दांडगा अनुभव असून, 'विकेटकीपर-ओपनर' या नव्या धोरणात तो चपखल बसतो.

इशान किशन

शुभमन गिलला मागे टाकत इशानने संघात आपली जागा पक्की केली आहे. झारखंडला 'सैयद मुश्ताक अली' जेतेपद मिळवून दिल्यानंतर आणि सनरायझर्स हैदराबादचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर इशानवर देखील बीसीसीआयचं लक्ष आहे.

अक्षर पटेल

अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षरची जागा संघात महत्त्वाची आहे. यापूर्वी त्याने उपकर्णधारपद भूषवले असले तरी, 2028 च्या नियोजनात तो किती तंदुरुस्त राहील, यावर प्रश्नचिन्ह आहे.

हार्दिक पांड्या 

एकेकाळी कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार असलेला हार्दिक आता या शर्यतीत काहीसा मागे पडला आहे. विश्वचषक विजयानंतरही संघ व्यवस्थापनाचा पूर्ण विश्वास संपादन करण्यात त्याला अडचणी येत आहेत.

निवड समितीसमोर पेच

चेतन शर्मा यांच्या जागी आलेले अजित आगरकर आणि त्यांची टीम आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तिलक वर्मासारख्या तरुण खेळाडूंमुळे संघात स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरचे पुनरागमन आणि सूर्याची कामगिरी यावरच भारतीय टी-20 क्रिकेटचे भवितव्य अवलंबून आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com