Mumbai News: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांब सागरी पूल म्हणजेच 'अटल सेतू'वर गेल्या काही काळापासून आत्महत्येच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. या गंभीर मुद्द्यावर राज्य शासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अटल सेतूवरील प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि अशा घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी पुलाच्या संवेदनशील भागांवर तातडीने संरक्षक जाळी बसवली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्या उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले, अटल सेतूवरील सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून अटल सेतू पूर्णपणे सुरक्षित राहावा आणि कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी व संबंधित सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येईल. समितीमार्फत अटल सेतूवर भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचा आराखडा तयार केला जाईल. तसेच अटल सेतूवर संरक्षक जाळीसह गस्ती वाढवणे, देखरेख पथक आदी उपाय योजना राबवण्यात येतील.

(नक्की वाचा- VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)
आतापर्यंत 15 घटना; 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू
- एकूण घटना: 15 आत्महत्येचे किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे नोंदवले गेले.
- एकूण मृत्यू: 12 जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला.
- बचाव: 3 जणांना वेळीच वाचवण्यात यश आले.
- बेपत्ता मृतदेह: 4 जणांचे मृतदेह अजूनही शोधता आलेले नाहीत.
(नक्की वाचा- Pune Lohagad Case: सियाने लग्नाच्या शॉपिंगसाठी केतनकडून उकळली मोठी रक्कम; एवढ्या पैशांचं काय केलं?)
अटल सेतूवर राबवण्यात येणारे सुरक्षा उपाय
पुलाचे जे भाग जास्त संवेदनशील आहेत, तिथे तातडीने तात्पुरते अडथळे उभे केले जातील. पुलाच्या कडेला अतिरिक्त संरक्षक जाळ्या किंवा ग्रिल्स बसवण्याचे काम वेगाने केले जाईल. सध्या पुलाच्या 33 किलोमीटरच्या एकूण कॅरेजवेपैकी 29.6 किलोमीटरच्या भागात बॅरियर्स किंवा ग्रिल्स आहेत. पुलावर 6 आपत्कालीन कॉल बॉक्स बसवण्यात आले आहेत, जे थेट मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहेत. पुलावर 24 तास सीसीटीव्हीची नजर असेल आणि पोलीस पथकांची गस्त वाढवण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world