KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील जागावाटप आणि रणनीती ठरवण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली खरी, मात्र या समितीवरून आता अंतर्गत कलह समोर आला आहे.
शिवसेनेचे कल्याण भिवंडी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांना या समितीतून वगळण्यात आल्यामुळे त्यांनी थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भाजपला कल्याण जिल्हाप्रमुखांचे नेमके वावडे का आहे, असा रोखठोक सवाल विचारत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.
पत्रावरील स्वाक्षरीवरून संशय
या वादाला तोंड फुटण्याचे मुख्य कारण म्हणजे समन्वय समितीचे जाहीर झालेले पत्र. अरविंद मोरे यांनी उपस्थित केलेल्या हरकतीनुसार, या महत्त्वपूर्ण पत्रावर केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.
( नक्की वाचा : Akola News : सत्तेची नशा उतरवली! एका सहीने अख्खी ग्रामपंचायत घरी धाडली, काय आहे प्रकरण? )
महायुतीमधील दुसरा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची या पत्रावर सही नसल्याने मोरे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
शिवसेनेच्या नेत्याची संमती किंवा स्वाक्षरी नसताना अशा प्रकारे समिती कशी जाहीर होऊ शकते, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

महायुतीची समन्वय समिती
कल्याण डोंबिवली निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या या समितीमध्ये दोन्ही पक्षांच्या अनेक दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या बाजूने रवींद्र चव्हाण यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, केडीएमसी निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी तसेच जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि राहुल दामले यांचा समावेश आहे.
दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्व शहराध्यक्ष निलेश शिंदे, संपर्क प्रमुख महेश गायकवाड, कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील आणि माजी नगरसेवक विश्वनाथ राणे या 8 नेत्यांना स्थान मिळाले आहे.
या समितीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अशा नेत्यांचाही समावेश आहे ज्यांनी काही काळापूर्वी स्वबळावर लढण्याची भाषा केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील आणि शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड या दोघांनीही वेळोवेळी आपापल्या पक्षासाठी आक्रमक भूमिका घेतली होती.
आता हेच दोन्ही नेते समन्वय समितीमध्ये एकत्र बसून युतीची समीकरणे कशी जुळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अरविंद मोरे यांच्यासारख्या सक्रिय जिल्हाप्रमुखाला डावलल्याने आगामी काळात महायुतीमध्ये समन्वय राखणे आव्हानात्मक ठरू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world