Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अशा कठीण प्रसंगी राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या प्रक्रियेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्य सरकारने 28 ते 30 जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. मात्र या दुखवट्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाला होता.
(नक्की वाचा- Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर 10 प्रश्न अनुत्तरित; कुटुंबीय, सहकाऱ्यांसह सगळेच चिंतेत )
निवडणूक आयोगाचे नियम काय सांगतात?
निवडणूक आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुका नियोजित वेळेतच पार पडतील. 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आणि 7 फेब्रुवारीची मतमोजणी यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. निवडणूक प्रचार काळात एखाद्या प्रमुख पदावरील व्यक्तीचे निधन झाल्यास निवडणूक रद्द करण्याचा कोणताही स्पष्ट नियम निवडणूक अधिनियमात नाही. केवळ संबंधित मतदारसंघातील उमेदवाराचा मृत्यू झाल्यास तिथे निवडणूक स्थगित केली जाते. शासकीय दुखवट्याचा कालावधी 30 जानेवारी रोजी संपत आहे, तर मतदान त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 5 फेब्रुवारीला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तारखा बदलण्याची आवश्यकता नाही.
(नक्की वाचा: Ajit Pawar Bodyguard: सावलीप्रमाणे अजित पवारांसोबत राहायचे, बॉडीगार्ड विदीप जाधव यांच्या शेजाऱ्यांची मोठी मागणी)
जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार
निवडणूक अधिनियमानुसार, काही विशेष परिस्थितीत मतदानाची तारीख बदलण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने बदल आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाकडे तसा प्रस्ताव पाठवू शकतात.मात्र, असा बदल मतदानाच्या 7 दिवस आधी करणे बंधनकारक असते. जर मतदानाच्या दिवशीच राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावर शासकीय दुखवटा असेल, तरच तारखांमध्ये फेरबदल केला जातो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world