
PM Modi Man Ki Baat : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील आदर्श पाटोदा गावाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. रविवारी 'मन की बात' या लोकप्रिय कार्यक्रमातून त्यांनी या गावातील उपक्रमांचे कौतुक केले. पाटोदा गाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक आदर्श उदाहरण मानले जाते. 2006 साली ग्रामपंचायतीला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
ग्रामपंचायतीने जलसंधारण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, अपारंपरिक ऊर्जा, डिजिटल ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत गावाचा चेहरामोहरा बदलला. दरम्यान 29 जून रोजी प्रसारित 'मन की बात'मध्ये मोदी यांनी पाटोदा ग्रामपंचायतीने शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे ग्रामीण भारतासाठी एक प्रेरणादायी उदाहरण उभे केल्याचे सांगितले.
पाटोदा ग्रामपंचायत ही भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायतींपैकी एक आहे आणि या यशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमात पाटोदाच्या उपक्रमांचा उल्लेख करून गावाचे कौतुक केले. या उल्लेखामुळे पाटोदाच्या यशाला राष्ट्रीय मान्यता मिळाली आणि हे गाव देशातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणास्थान बनले आहे.

Patoda Village
कचरा व्यवस्थापनाची सिस्टम
पाटोदा गावाने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023 मध्ये कार्बन न्यूट्रल श्रेणीत दुसरे स्थान मिळवले होते. ज्यामुळे गावाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना विशेष मान्यता मिळाली. पाटोदा यांनी कार्बन न्यूट्रल दर्जा मिळवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. गावात कचरा व्यवस्थापनाची एक कार्यक्षम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक घरातून ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा केला जातो आणि त्यासाठी प्रत्येक घरासमोर दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट बनवले जाते, तर प्लास्टिकसारखा सुका कचरा गोळा करून विकला जातो. यामुळे गावात कचरा टाकण्याची सवय पूर्णपणे बंद झाली आहे.

जलप्रदूषणावर लक्ष
गावातील घाणेरडे पाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जाते, ज्यामुळे जल प्रदूषण रोखले जाते. गावात 15 सौर दिवे आणि 11 बायोगॅस प्लांट कार्यरत आहेत. त्यापैकी दोन बायोगॅस प्लांट शौचालयांना जोडलेले आहेत. हे प्रकल्प पर्यावरणपूरक ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देतात. याशिवाय, वृक्षारोपणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक गावकऱ्याला आणि विद्यार्थ्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक झाड भेट दिले जाते आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते.

गावात दोन मोफत पीठ गिरण्या सुरू करण्यात आल्या आहेत, ज्या वर्षभर प्रत्येक कर भरणाऱ्या कुटुंबाला मोफत धान्य दळण्याची सुविधा देतात. पाटोदा ग्रामपंचायतीने केवळ पर्यावरण संरक्षणातच नव्हे तर सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गावात 34 नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले, ज्यामुळे गावाला केंद्र आणि राज्य सरकारकडून एकूण 24 पुरस्कार मिळाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world