- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रेल्वेफाटकमुक्त परिसरासाठी महारेलसोबत सामंजस्य करार केला आहे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन दिले आहे
- सामंजस्य कराराद्वारे रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांची जलद आणि दर्जेदार बांधणी सुनिश्चित होणार आहे
सूरज कसबे
वाहतूक कोंडी आणि पुणे यांचं एक वेगळ नातं आहे. हे नात अतुट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आता या वाहतूक कोंडीवर रामबाण इलाज शोधण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) क्षेत्रातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि संपूर्ण परिसर रेल्वेफाटकमुक्त करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमआरडीए हद्दीतील रेल्वे उड्डाणपूल (ROB) आणि भुयारी मार्ग (RUB) यांच्या जलद आणि दर्जेदार बांधकामासाठी पीएमआरडीएने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) या कंपनीसोबत अधिकृत सामंजस्य करार (MoU) केला आहे.
या करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष पुढाकार घेतले होते. मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूककोंडीची समस्या गांभीर्याने घेतली होती. रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, पादचारी पूल (FOB) आणि भुयारी मार्ग वेगवेगळ्या यंत्रणांऐवजी, या क्षेत्रातील तांत्रिक अनुभव असलेल्या महारेलमार्फतच करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार या प्रकल्पाला वेग आला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम ही लवकरच दिसतील.
महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या सामंजस्य कराराचा मसुदा तातडीने अंतिम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल आणि पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी यांच्यासह दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सामंजस्य करारामुळे पुणे परिसरातील प्रवाशांचा प्रवास आता सुकर आणि गतीमान होणार आहे.
पुणेकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यात रेल्वे फाटकांमुळे रस्त्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आता इतिहासजमा होणार आहेत. उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांमुळे वाहतूक विनाअडथळा सुरू राहील. ज्यामुळे नागरिकांचा प्रवास वेगवान होईल. पुण्यात अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीची समस्या आहे. छोटे रस्ते आणि मोठ्या प्रमाणात वाहनं याची ही अडचण होती. पण या सर्वांचा विचार करून त्यातून मार्ग काढला जात आहे. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका झाली तर पुणेकरांचा प्रवास हा आणखी गतीमान होणार आहे हे मात्र निश्चित मानले पाहीजे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world