Ajit Pawar News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. बारामती विमानतळ परिसरात कमी दृश्यमानता असेल तर सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्टपणे कसं दिसतंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
मौन का बाळगलं आहे? : सुषमा अंधारे
शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटलंय की," बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असे अनेकजण अपघाताचे कारण सांगत आहेत. पण खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं. जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घिरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे? काल लगेच यावर बोलणं संकेताला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही? अजित दादांच्या नंतर पक्षातील जेष्ठता क्रम असणारे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगलं आहे? साहेबांचे राष्ट्रवादीतले ही ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? हे फक्त पवार कुटुंबाचे नुकसान नाही हे महाराष्ट्राचे नुकसान आहे. #रक्तरंजितराजकारण
(नक्की वाचा: Ajit Pawar: अजित पवारांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी परवानगीशिवाय घडली गंभीर घटना, जर संशयास्पद आढळलं तर...)
ममता बॅनर्जी यांनीही उपस्थित केली होती शंका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीअंतर्गत विमान अपघाताची चौकशी करावी आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली.
(नक्की वाचा: Ajit Pawar Video: अजित पवार विमान प्रवासात प्रचंड घाबरले होते, देवाच्या नावाचा करू लागले होते जप, पाहा VIDEO)
यानंतर शरद पवार यांनी स्पष्ट केले की, "जे काही झालंय त्याचं नुकसान भरून निघणारं नाही. पण सर्वच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासमोर येणार नव्हतो, पण काही माध्यमांमध्ये अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकात्यावरून मांडली गेलीय, असं कळलं. पण यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे."
अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण देशाला प्रचंड मोठा धक्का बसलाय.