- बीड जिल्ह्यातील उमापूर गावात एका १९ वर्षाच्या तरुणीने नऊ जणांना लग्नाच्या नावे फसवले आहे
- या तरुणीच्या टोळीने पीडित तरुणाकडून लाखो रुपयांची फसवणूक केली असून त्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे
- लग्नानंतर नवरीने आपले रंग दाखवले शिवाय लाखो रूपये घेवून पोबारा केला.
आकाश सावंत
अनेक तरुणांची लग्न होत नाही. अशा वेळी ते मिळेल त्या तरुणी सोबत लग्न करण्यास तयार होता. अशा तरुणांचा मोठ्या प्रमाणात गैर फायदा घेतला जातो. त्यातून होते ती फसवणूक. लग्न जमवताना होणारी ही फसवणूक आता ग्रामीण भागासाठी चिंतेचा विषय बनली आहे. बीड जिल्ह्यातील उमापूर गावात अशाच एका 'बोगस' लग्नाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. शिवाय लग्न केलेला नवरा पुर्ण पणे कोसळला आहे. लग्नाची फसवणूक झाली ती झाली पण बायको सोबत पैसा आणि दागिने ही तो गमावून बसला. विशेष म्हणजे हा गंडा त्याला एका 19 वर्षाच्या तरुणीने घातला आहे. तो तिच्या देखणे पणावर भाळला पण आयुष्याची कमाई गमावून बसला.
एका १९ वर्षीय तरुणीने तब्बल 9 जणांना लग्नाच्या जाळ्यात ओढल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या उमापूर येथील एका तरुणाची या बोगस टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. दिसायला देखण्या असलेल्या 19 वर्षीय तरुणीचे यापूर्वी 8 मुलांसोबत लग्न लावून देण्यात आले होते. पैशांच्या हव्यासापोटी एजंटने या तरुणीचे नववे लग्न उमापूर येथील तरुणाशी लावून दिले. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच या टोळीचा खरा चेहरा समोर आला. नवरदेवाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या टोळीमध्ये काही एजंटचा समावेश आहे. ते ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांना शोधून त्यांना जाळ्यात ओढतात. तसचं काहीसं उमापूरातील या पीडित नवरदेवा सोबत झालं. त्याला आधी साडे तिन लाख रुपये मागण्यात आले. त्यानंतर मुलगी दाखवण्यात आली. त्याला ती पसंत पडली. तो लग्नाला तयार ही झाला. रितसर लग्न लावण्यात आलं. नंतर मात्र नवरी आपले रंग दाखवू लागली. आईकडे जायचं आहे असं सांगत होती. त्यासाठी खोटी आई तयार करण्यात आली. पण त्यानंतर ही तिची डाळ काही शिजली नाही. मग तिनेच स्वत:हून नवऱ्याला आपली आधी 8 लग्न झाली आहेत असं सांगितलं. ऐवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने त्याचे पुरावे ही त्याला दिले.
हे पाहुन नवऱ्याच्या पाया खालची वाळू सरकली. या नवरीने लाखो रूपयांची कॅश आणि दागिने घेवून नंतर पोबारा केला. जवळपास नऊ लाखांचा ऐवज तिने लंपास केला. लग्नाच्या नावाखाली या टोळीने पीडित तरुणाकडून लाखो रुपये उकळले आहेत. फसवणूक झालेला नवरदेव योगेश शिंदे याने अखेर या प्रकरणी न्यायासाठी पोलीस प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या गंभीर प्रकारानंतर पीडित नवरदेवाने बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पीडिताने थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यात सक्रिय असलेल्या अशा बोगस टोळ्यांमुळे अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने, अशा टोळ्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world