
भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
मिठी नदी स्वच्छता प्रकरणात मुंबई पोलिसांकडून बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाची चौकशी केली जात आहे. मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीच्या स्वच्छतेबाबत एक करार करण्यात आला होता. या करारावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 49 वर्षीय डिनो मोरिया आणि केतन कदम संपर्कात होते. केतन या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्याला अटक करण्यात आली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कॉल रेकॉर्डवरुन सत्य आलं समोर...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केतन कदम आणि त्याचा सहआरोपी जय जोशी यांच्यातील कॉल रेकॉर्ड तपासले, त्यादरम्यान डिनो मोरियाचं नाव समोर आलं. सध्या मोरियाची चौकशी सुरू आहे. त्याच्यासोबत आणखी काही आरोपी जोडले गेले आहे, याचाही शोध घेतला जात आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 65 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कंत्राटासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) अधिकारी, केरळमधील एक कंपनी, केतन कदम आणि जय जोशी (जे ड्रेजिंग मशीन भाड्याने देतात) यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप होता.
नक्की वाचा - Mumbai Rain: 'बाताशिष शेलार...', मुंबईच्या पावसावरुन राजकारण तापलं, ठाकरे गटाची बॅनरबाजी
नेमका काय आहे हा घोटाळा2005 ते 2021 या कालावधीत मिठी नदी गाळ काढणी प्रकल्प सुरू होता. यासाठी 1100 कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, 18 जणांना यासंदर्भातील कंत्राट देण्यात आलं होतं. पालिकेने गाळ काढण्यासाठीचं कत्राट आणि यंत्र-गाळ काढण्याची उपकरणं भाड्याने घेण्यासाठी अनियमितता झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून महापालिकेचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी केली जात आहे.
या सगळ्यांनी मिळून पालिकेचे 65 कोटी 54 लाखांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील संबंधित सात ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये चार लोकांना अटक करण्यात आली. एसआयटीने प्राथमिक चौकशीत एकूण 9 जागांचे सामंजस्य करार (MoU) पडताळणी करण्यात आली. यातील काही करारांवर स्वाक्षरीतही घोळ असल्याचं लक्षात आलं. तर काही करारांवर तारीखही टाकण्यात आलेली नाही.
अॅक्युट डिझाईन्स, कैलास कंन्स्ट्रक्शन कंपनी, 3) एन.ए. कन्स्ट्रक्शन 4) निखील कंन्स्ट्रक्शन कंपनी 5) जे.आर.एस इन्फ्रास्ट्रक्चर यांनी खोटे आणि बनावट एमओयू सादर केले, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नक्की वाचा - मुंबईकरांना पहिल्या पावसाचा फटका, कामात दिरंगाई करणाऱ्या 4 अधिकाऱ्यांवर महापालिकेची कारवाई
महानगरपालिकेच्या पर्जन्य जल वाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सत्यता पडताळणी न करता कंत्राटदारांशी संगनमत केल्याचा आरोप आहेत. त्यातील करार करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा 20 वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मॅटप्रॉप कंपनीने मिठी नदीचा दौरा करून महापालिका अधिकाऱ्यांना केरळ व दिल्ली येथे गाळ काढणी यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवले. सप्टेंबर 2020 मध्ये महापालिकेचे उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे, तायशेट्टे, प्रशांत रामुगडे आदी अधिकाऱ्यांनी दौरा केला. त्यानंतर या कामासाठी केवळ मॅटप्रॉपच्या मशीनच आवश्यक आहेत असा अहवाल सादर केला. तसेच तीन कोटीची मशीन खरेदी करण्यापेक्षा ती चढ्या भावाने भाडेतत्त्वावर घेण्याची शिफारस केली. त्यामुळे कंत्राटदार कंपन्यांना केवळ याच कंपनीकडून मशीन घ्याव्या लागल्या. सुरूवातीला त्याचे भाडे आठ कोटी रुपयांपर्यंत भाडे दाखवण्यात आले, त्यानंतर ते 4 कोटीवर ठरले.
2021-22 मध्ये या मशीनसाठी दर वाढवून सादर करण्यात आले. सुरूवातीला या मशिनचे दर 1609 रुपये प्रति टन होते. मात्र त्या किमतीत वाढ करून ते चढ्या भावाने म्हणजे 2193 व 2366 रुपयात घेण्यात आले. त्यामुळे 17 कोटी 7 लाख रुपयांचा महापालिकेचा अतिरिक्त खर्च झाला असे दाखवण्यात आले. या गैरप्रकारात अनेकजण सहभागी आहेत, असा पोलिसांचा संशय आहे. परिणाम या प्रकरणात सध्या अधिकारी, कंत्राटदार, मध्यस्थी आणि यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींची चौकशी सुरू आहे. उपअभियंत्यांच्या अंदाजावर हे प्रमाण निश्चित करण्यात आले आणि त्यानुसार निविदा रकमेत वाढ करण्यात आली. त्याचा फायदा कंत्राटदारांना झाला आणि प्रत्यक्षात मात्र गाळ काही काढण्यात आला नाही असे असे आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीत समोर आले आहे.
डिनो मोरियाचा या प्रकरणाशी काय संबंध?
मिठी नदीच्या कथित घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमनं बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेकदा फोनवरून संभाषण केल्याचे पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. सध्या डिनो मोरियाची चौकशी सुरू असून मुख्य आरोपीसोबत डिनोचं आणि त्याच्या भावामध्ये काय बोलणं झालं, याचा शोध घेतला जात आहे. आरोपीचे कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या काही नोंदीत डिनोचं नाव असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस विविध अँगल्सने डिनो मोरिया याची चौकशी करत आहेत. आर्थिक गुन्हे शाखा उपयुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मिठी नदी स्वच्छता करारात अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ व दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पालिकेला 65 कोटी 54 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसआयटीकडून मुंबईत सात ठिकाणी छापे टाकण्यात आले, यामध्ये काहींना अटक करण्यात आली आहे. तर यामध्ये अधिक तपास सुरू आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world