
मुंबई: गेल्या चार दिवसांपासून सुरु झालेल्या धुवाँधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली. मान्सूनच्या एन्ट्रीनंतर झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईमध्ये पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एकीकडे संपूर्ण नालेसफाईचा दावा करणाऱ्या ्महायुतीची चांगलीच कोंडी झाली. यावरुनच आता राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीवर जोरदार निशाणा साधला होता. महायुतीच्या भ्रष्ट कारभारामुळेच मुंबई डुबली अशी टीका त्यांनी केली होती. यावरुनच भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. आशिष शेलार यांच्या या टिकेला आता शिवसेना ठाकरे गटाने ूबॅनरबाजीतून उत्तर दिले आहे.
मुंबईत पडलेल्या पहिल्या पावसात मुंबईत पाणी साचलं मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहे अशी टीका भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केली होती. याला आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उत्तर देण्यात आलेले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी आशिष शेलार यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाच्या बाहेर तसेच वांद्रे परिसरात बॅनर लावलेले आहेत.
( नक्की वाचा : Muhammad Yunus : भारताला आव्हान द्यायला निघालेलं युनूस सरकार कोंडीत! बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तांतर? )
ठाकरे गटाने लावलेल्या या बॅनरमध्ये आशिष शेलार यांचा उल्लेख "बाता"शिष शेलार असा केला आहे. "तुम्हाला मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडलं नव्हतं तुम्ही लाथ मारून आत शिरला आहात आणि पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचं तोंड माईकमध्ये" असं म्हणत शेलारांवर जोरदार टीका केली आहे. पावसावरुन रंगलेल्या या राजकारणाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world