- कल्याणमध्ये दोन महिलांनी लग्नाचे आमिष दाखवून एका व्यवसायिकाची फसवणूक केली
- रोमा परदेशी आणि जयश्री पाटील या महिलांनी इन्शुरन्सच्या नावाखाली व्यवसायिकाचा विश्वास संपादन केला
- व्यवसायिकाला लग्नाची तयारी दर्शवून दोघींनी विविध कारणे सांगत सातत्याने पैसे उकळण्याचा प्रकार चालवला होता
अमजद खान
लग्नाचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. पण कल्याणमध्ये एक भलतच प्रकरण समोर आलं आहे. यात दोन महिलांनी लग्नाचं आमिष दाखवून एका व्यवसायाची लुट केली आहे. या दोघांनी या व्यवसायिकाकडून जवळपास 55 लाख रूपये उकळले आहेत. आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने कल्याण पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार कारवाई करत पोलीसांनी या दोघींना ही अटक केली आहे. पण या दोघांचा गुन्हा करण्याचा फंडा पाहून पोलीस ही चक्रावले आहेत.
कल्याण पश्चिमेतील एका नामांकित दुकानाचा मालक आहे. याची ओळख जयश्री पाटील हिने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी करून दिली होती. रोमा एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत काम करत असल्याचे या व्यवसायिकाला सांगण्यात आले. त्यानंतर रोमाने या व्यावसायिकाशी जवळीक वाढवली. सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून ओळख निर्माण करण्यात आली. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन करण्यात आला. व्यावसायिक ही तिच्या सौंदर्या पुढे भाळला आणि तिच्या आहारी गेला.
रोमा परदेशी हिने इन्शुरन्सच्या नावाखाली व्यवसायिकाकडून लाखो रुपये घेतले. मात्र कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी तिने काढली नाही. काही दिवसानंतर रोमा हिने जयश्री पाटील मार्फत संबंधित व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली. लग्नासाठी होकार दिल्यानंतर दोन्ही महिलांनी वेळोवेळी विविध कारणे सांगत संबंधित व्यावसायिकाकडून पैसे उकळले अशी माहिती कल्याण पोलीसांनी दिली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 55 लाख रुपये त्यांनी या दोघींना दिले आहेत.
फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने महात्मा फुले पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रोमा परदेशी हिला अटक केली होती. तिला नंतर जामीन मिळाला. तपासा दरम्यान पोलिसांनी तिची मैत्रीण जयश्री पाटील हिला कोल्हापूरमधून अटक केली आहे. तक्रारदार व्यावसायिकाने पोलिसांकडे आपले पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. “लग्नाचे आमिष दाखवून माझ्यासोबत फसवणूक करण्यात आली. आरोपींकडून रक्कम वसूल करून मला न्याय मिळावा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. फसवणूक झालेला व्यवसायिक 45 वर्षांचा आहे. 13 वर्षांपूर्वी जयश्री पाटील याची ग्राहक म्हणून व्यवसायिकाशी ओळख झाली होती. 6 वर्षापासून रोमा ही व्यवसायिकाच्या संपर्कात आहे. तिने लग्नाचे आश्वासन दिल्याने व्यवसायकाने दुसरे लग्न केलं नव्हतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world