- मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन २२७ जागांसाठी उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला
- काँग्रेस १६५ जागांवर तर वंचित 62 जागांवर उमेदवार देणार होते
- मात्र या दोन्ही पक्षांना सर्व उमेदवार उभे करता आले नाहीत.
मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपची युती आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने वेगळी चुल मांडली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना UBT एकत्र लढत आहेत. शिवाय काँग्रेसने ही वंचित सोबत मोट बांधली आहे. या सर्वच पक्षांची जागा वाटपाची चर्चा शेवट पर्यंत सुरू होती. पण यातील एका आघाडीतील पक्षांना सुटलेल्या सर्व जागांवर उमेदवारच देता आले नसल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे जास्त जागा तर मिळाल्या पण उमेदवारच मिळाले नाहीत अशी अवस्था या पक्षांची झाली आहे.
अशी स्थिती मुंबईत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची झाल्याचं समोर आलं आहे. या आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला 165 जागा आल्या होत्या. तर वंचितसाठी 62 जागा सोडण्यात आल्या. मंगळवारी मुंबई महापालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. यावेळी दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. पण त्यांना सुटलेल्या जागांच्या तुलनेत उमेदवारी जाहीर केलेल्या जागा ह्या कमी आहेत. त्यामुळे जागा मिळाल्या पण उमेदवार मिळाले नाहीत अशी स्थिती वंचित आणि काँग्रेसची मुंबईत झाल्याची चर्चा आहे.
मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि वंचितची युती झाली आहे. त्यानंतर जागावाटप ही झालं. काँग्रेसने सर्वाधिक 165 जागा लढण्याचा निश्चय केला. दुसरीकडे वंचितने 62 जागा लढण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना तेवढे उमेदवारही देता आले नाहीत. दोघे मिळून 227 जागा लढणार होते. पण प्रत्यक्षात त्यांनी 172 जागांवर दोघांनी मिळून उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने 165 पैकी 143 जागांवर उमेदवार जाहीर केले. तर वंचितने 62 जागांपैकी केवळ 29 जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. तब्बल 55 जागांवर दोघांकडे उमेदवारच नसल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी केला आहे.
संजय निरूपम यांनी याबाबत सांगितले की, काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला 62 जागा सोडल्या होत्या. पण 21 अशा जागा आहेत जिथे आंबेडकर यांच्याकडे उमेदवारच नाहीत. प्रकाश आंबेडकर या जागा काँग्रेसला परत देतायत.पण काँग्रेसकडे देखील या ठिकाणी उमेदवार नाहीत. या जागांवरील काँग्रेसच्या उरल्या सुरलेल्या मतदारांसाठी सहानुभूती आहे असं संजय निरूपम म्हणाले आहे. वंचित तीन याद्या जाहीर केल्या. तर काँग्रेसने आपली शेवटची यादी जाहीर केली त्यावरून ही आकडेवारी समोर आली आहे. यात मागे पुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवारपर्यंत हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. पण प्रथमदर्शनी दोन्ही पक्ष सर्व उमेदवार देण्यास कमी पडल्याचे जाणवत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world