Gold News: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशाची आर्थिक सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गेल्या सहा महिन्यांत (मार्च ते सप्टेंबर 2025) आरबीआयने परदेशात ठेवलेला तब्बल 64,000 किलो (64 tonnes) इतका मोठा सोन्याचा साठा परत भारतात आणला आहे. जागतिक स्तरावर वाढत्या भू-राजकीय तणावाच्या (Geopolitical Tension) पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय, भारताची आर्थिक स्वायत्तता (Financial Autonomy) आणि देशाची संपत्ती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने एक मोठी आणि दूरदृष्टीची पहल मानली जात आहे.
सोने परत आणण्याचे मुख्य कारण काय?
RBI ने हे सोने परत का आणले? याचे मुख्य कारण जागतिक अस्थिरता आणि आर्थिक सुरक्षेशी जोडलेले आहे. जगभरात भू-राजकीय तणाव वाढत असताना, अनेक देशांना 'अॅसेट फ्रीज' (Asset Freeze) आणि आर्थिक निर्बंधांसारख्या (Sanctions) परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा वातावरणात, सोन्यासारखे महत्त्वाचे रिझर्व्ह देशाच्या हद्दीत सुरक्षित ठेवणे, हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो.
( नक्की वाचा : 8th Pay Commission: लॉटरी लागली! 'फिटमेंट फॅक्टर'नुसार पगार दुप्पट होणार? तुमचं वेतन किती वाढेल? इथं करा चेक )
आरबीआयचे मत आहे की, देशांतर्गत तिजोरीमध्ये (Domestic Vaults) सोने ठेवल्यास जागतिक संकट किंवा व्यापार निर्बंधांच्या काळात देशाची आर्थिक ताकद अबाधित राहते. रशिया, इराण आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांवर पाश्चात्त्य देशांनी लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, भारताने हा निर्णय जोखीम कमी करण्याच्या (Risk Mitigation) धोरणाचा एक भाग म्हणून घेतला आहे. हा निर्णय भारताच्या 'वित्तीय स्वायत्तते'च्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे.
भारताच्या सोन्याचा एकूण साठा आणि ठेवण्याची ठिकाणे
या महत्त्वपूर्ण 'गोल्ड रिपॅट्रिएशन'मुळे (Gold Repatriation) आता आरबीआयच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी मोठा हिस्सा भारतात जमा झाला आहे. सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत, आरबीआयकडे एकूण 880.8 टन सोन्याचा साठा जमा झाला आहे. यापैकी आता 575.8 टन सोने भारतात ठेवण्यात आले आहे.
उर्वरित सुमारे 290.3 टन सोने अजूनही बँक ऑफ इंग्लंड (Bank of England) आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS) यांसारख्या विदेशी संस्थांकडे ठेवलेले आहे. 31 मार्च 2024 पर्यंत आरबीआयकडे 822.10 टन सोने होते. याचा अर्थ एका वर्षात सोन्याच्या साठ्यामध्ये 57.48 टन इतकी मोठी वाढ झाली आहे.
आरबीआयने हे मौल्यवान सोने सुरक्षित ठेवण्यासाठी खास 'गोल्ड वॉल्ट्स' (Gold Vaults) तयार केले आहेत. हे वॉल्ट्स मुंबई आणि नागपूर येथे आहेत.
( नक्की वाचा : Money View App Scam : तुमचा डेटा वाचवा! फक्त 3 तासांत 49 कोटींची ऑनलाईन लूट, वाचा काय आहे भयंकर घोटाळा? )
सोन्याची 'घरवापसी' आणि दरांवर परिणाम
सोन्याला मायदेशात परत आणण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. मागील दोन वर्षांतील आकडेवारी: मार्च 2023 पासून आजपर्यंत, आरबीआयने परदेशातून एकूण 274 टन सोने परत भारतात आणले आहे.
विविध मध्यवर्ती बँकांनी (Central Banks) मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी सुरू ठेवल्यामुळे आणि सोन्याला मायदेशात परत आणल्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल 52% पर्यंतची वाढ नोंदवण्यात आली आहे. 20 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किमती 4,381.21 डॉलर प्रति औंस या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या होत्या.
आरबीआयचा हा निर्णय केवळ साठवणुकीचा मुद्दा नाही, तर देशाच्या आर्थिक भवितव्यासाठी आणि जागतिक धक्क्यांपासून देशाला वाचवण्यासाठी तयार केलेले एक महत्त्वाचे 'संरक्षण कवच' आहे.