
भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) आनंदाची बातमी दिली आहे. हवामान खात्याने यंदा पावसाचे आगमन वेळेच्या आधी (Monsoon likely to reach early) होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्येकडून येणारा पाऊस हा केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होतो. यंदा पाऊस 1 जूनच्या आधीच दाखल होईल अशी शक्यता आहे. IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार जर यंदा पाऊस आधी दाखल झाला तर 2009 नंतरची पाऊस वेळेच्या आधी दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असेल. 2009 साली 23 मे रोजी पाऊस भारतात दाखल झाला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पावसाचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर भारतात पावसाचे आगमन झाल्याची भारतीय हवामान खात्यातर्फे अधिकृत घोषणा केली जाते. नैऋत्य दिशेकडून आगमन होणारा मॉन्सून 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात आपले हातपाय पसरत असतो. सर्वसाधारणपणे 17 सप्टेंबरपर्यंत भारतामध्ये पावसाचे बस्तान असते. सर्वसाधारणपणे 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस आपला गाशा गुंडाळत असतो.
नक्की वाचा : पाकिस्तानचे मित्रराष्ट्र असलेल्या 2 देशांच्या पर्यटनावर बहिष्कार
पावसाचे आगमन कोणत्या वर्षी कधी झाले?
गेल्या वर्षीचे बोलायचे झाल्यास पावसाचे आगमन 30 मे रोजी दाखल झाला होता. त्यापूर्वी पावसाचे आगमन कधी झाले होते ते पाहूया.
- 2023 साली भारतामध्ये पावसाचे आगमन 8 जून रोजी झाले होते
- 20222 साली भारतामध्ये पावसाचे आगमन 29 मे रोजी झाले होते
- 2021 साली भारतामध्ये पावसाचे आगमन 3 जून रोजी झाले होते.
- 2020 साली भारतामध्ये पावसाचे आगमन 1 जून रोजी झाले होते.
- 2019 साली 8 जून रोजी पावसाचे आगमन झाले होते.
- 2018 साली 29 मे रोजी पावसाचे भारतात आगमन झाले होते.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की पावसाचे आगमन लवकर झाले म्हणजे भारतामध्येही तो सर्वत्र लवकर पसरेल याचा काहीही संबंध नाहीये. केरळमध्ये पाऊस लवकर दाखल झाला याचा अर्थ तो भारताच्या अन्य भागातही वेळेच्या आधी पोहोचेल असं म्हणणे चुकीचे ठरेल असे त्यांनी म्हटले. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पावसाचा उत्तरेकडील प्रवास हा बदलणाऱ्या वैश्विक, क्षेत्रीय आणि स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असतो.
नक्की वाचा : रोहितनंतर विराट कोहलीही कसोटी क्रिकेटला रामराम
यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने एप्रिल महिन्यात पावसाबद्दलचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये 2025 साली सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अल-निनोचा मॉन्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही अशी सुवार्ताही हवामान खात्याने दिली होती. अल-निनोमुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत असते. तशी स्थिती यावर्षी दिसत नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. भूविज्ञान खात्याचे सचिव एम.रवीचंद्रन यांनी म्हटले होते की, भारतामध्ये यंदा पावसाच्या 4 महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.