
'ही याचिका ऐकताना कोर्टाचा संपूर्ण दिवस वाया गेला. याचिकाकर्त्यांना खरंतर दंड लावायला होता, मात्र आम्ही तसे केलेले नाही.', अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना तासून काढले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर 2024 (Maharashtra Assembly Election 2024 Result) मध्ये पार पडली होती. मतदानाची वेळ संध्याकाळी 6 पर्यंत होती. संध्याकाळी सहानंतर 75 लाख मते पडल्याचा दावा करत चेतन अहिरे यांनी एका याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
(नक्की वाचा:'काले कौवे से डरियो…किती काळ हवेत बाण सोडणार?' राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं चोख उत्तर)
याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय होते ?
महाराष्ट्रातील एकूण 95 मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीत तफावत असल्याचाही दावा करण्यात आला होता. एकूण पडलेली मते आणि मोजण्यात आलेली मते यांच्यात तफावत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना सविस्तरपणे उत्तर दिले होते. त्यानंतरही राहुल गांधींनी आरोप करणे सुरू ठेवले असून उच्च न्यायालयाचा निकाल या या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.
(नक्की वाचा: CM फडणवीसांच्या मतदारसंघावरुन राहुल गांधींचा मोठा आरोप, निवडणूक आयोगाला सवाल)
प्रकाश आंबेडकरांनी मांडली याचिकाकर्त्याची बाजू
या याचिकेवरील सुनावणी आधीच पूर्ण झाली होती आणि खंडपीठाने आपला निकाल राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने आपला निकाल सुनावला. यावेळी ही याचिका आपण फेटाळून लावत असल्याचे सांगितले. या प्रकरणातील याचिकाकर्ते चेतन अहिरे हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असून त्यांच्यातर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाकडून ॲड. उदय वारुंजीकर आणि आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली.
निकालावर तूर्तास प्रतिक्रिया देण्यास आंबेडकरांचा नकार
याचिकार्त्याचे वकील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी मतदान झालं होतं, ज्यापैकी 19 जागांवर नोंदणीकृत मतदारांच्या संख्येपेक्षाही जास्त मतदान झाले आहे. हे अधिकचे मतदार कुठून आले असा प्रश्न याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला होता. मतदानाच्या अखेरच्या टप्यात अचानक 75 लाख मतांची नोंद कशी झाली असे विचारत पूर्वीच्या एकूण आकडेवारीशी ही नोंद कुठेही जुळत नाही, असं याचिकेतून म्हटलं होत .'ही याचिका का फेटाळली हे संपूर्ण निकाल आल्यानंतर समजेल. त्या निकालाचे वाचन केल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन', असे याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world