End Cash Toll Payments from April : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुसह्य आणि वेगवान करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. 1 एप्रिल 2026 पासून देशभरातील टोल प्लाझावर रोख रक्कमेने टोल भरणे पूर्णपणे बंद केले जाऊ शकते. यानंतर वाहनधारकांना केवळ फास्टॅग (Fastag) किंवा यूपीआय (UPI) च्या माध्यमातूनच टोल भरावा लागेल.
रोख व्यवहार बंद करण्यामागचा उद्देश
NHAI ने हा प्रस्तावित बदल टोल प्लाझाच्या कामकाजातील कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी केला आहे. रोख व्यवहारामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. डिजिटल पेमेंटमुळे प्रतीक्षा वेळ कमी होईल. सर्व व्यवहार ऑनलाइन असल्याने टोल वसुलीत अधिक पारदर्शकता आणि अचूकता येईल. 'ईझ ऑफ ट्रॅव्हल' (Ease of Travel) या धोरणांतर्गत प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता येईल.
(नक्की वाचा- कोकणवासियांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून सेवेत; चेक करा वेळापत्रक आणि तिकीट)
सध्याची परिस्थिती आणि नवे नियम
देशात सध्या 98 टक्क्यांहून अधिक टोल वसुली फास्टॅगच्या माध्यमातून होत आहे. तरीही काही प्रमाणात रोख व्यवहार सुरू आहेत, ज्यावर आता बंदी येणार आहे. सध्या वैध फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून रोख पैसे घेताना दुप्पट टोल वसूल केला जातो. यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या प्रवाशांकडून सध्या केवळ 1.25 पट शुल्क घेतले जाते. 1 एप्रिल नंतर रोख खिडकी पूर्णपणे बंद करून केवळ डिजिटल पर्याय उपलब्ध असतील.
(नक्की वाचा- VIDEO: "लोक नगरसेवक व्हायच्या आधीच...", मुरलीधर मोहोळांनी स्वत: लावला नगरसेवकाच्या ऑफिसचा बोर्ड)
1150 पेक्षा जास्त टोल प्लाझावर परिणाम
देशभरातील विविध राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर मिळून 1150 हून अधिक टोल प्लाझा आहेत. या सर्व ठिकाणी केवळ डिजिटल प्रणाली लागू झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थापन सुधारेल, प्रवाशांचे वाद कमी होतील. तंत्रज्ञान-आधारित उच्च-कार्यक्षमता असलेला महामार्ग नेटवर्क विकसित करण्याच्या NHAI च्या व्यापक उद्दिष्टाचा हा एक भाग आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world