
पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं. त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. त्यात एका स्थानिक काश्मिरी तरुणालाही गोळ्या घालून ठार करण्यात आलं. त्याचं नाव आहे सईद आदिल हुसेन. सईद हा पहलगाममधल्या बैसरण खोऱ्यात घोड्यावरुन पर्यटकांना घेऊन जायचा. एक राऊंड झाली तर तीनशे रुपये मिळायचे, कधी दुसरी राऊंड झाली तर सहाशे रुपये मिळायचे. या व्यवसायातून फार फायदा होत नव्हता, म्हणून दुसरं काही तरी करायचं सईदनं ठरवलं होतं. ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी सईद बहिणीला म्हणाला, आजच्या पुरतं जातो, उद्यापासून दुसरं काहीतरी करतो. असं म्हणून सईद घराबाहेर पडला. तो परत आलाच नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्याची बहिण सांगते की तो दुसऱ्या दिवसापासून घरी बसणार होता. त्याला आता दुसरं काम करायचं होतं. पण तो त्या दिवशी शेवटचं जातो असं सांगू घराबाहेर पडला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जे 27 जण मारले गेले, त्यापैकी सईद हा एकमेव स्थानिक काश्मीरी होता. दहशतवादी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत होते. त्यावेळी सईदनं एका दहशतवाद्याला थांबवलं. पर्यटकांना का मारता. म्हणून जाब विचारला. मुलांना, बायकांना का मारता म्हणून दहशतवाद्यांना दरडावलं. दहशतवादी ऐकत नाही, म्हटल्यावर त्याच्या हातातली बंदूक त्याने खेचली. त्यावेळी चिडलेल्या दहशतवाद्यानं सईदच्या हातातून बंदूक काढून घेतली, आणि त्यालाच गोळ्या घालून ठार केलं.
सईदचे वडील हैदर शाह सांगतात की आपला लेक दहशतवाद्यांना विचारत होता, की बेगुनाह को क्यूं मारा, मात्र हे विचारत असतानाच त्याला तीन गोळ्या घातल्या. सईदची दुसरी बहीणी ही म्हणते आता भय्याला कुठून शोधायचं, माझ्यावर तो खूप प्रेम करायचा. सईदच्या मृत्यूमुळे घरातला कर्ता पुरुष गेलाय. मात्र त्यानं जे केलं. त्यावर त्याचे वडील म्हणतायत, मला सईदच्या हौतात्म्यावर गर्व आहे. तो पर्यटकांना वाचवता वाचवता शहिद झाला. त्याने महिला आणि लहान मुलांना वाचवलं.
सईदच्या आईला मुलाच्या मृत्यूनं मोठा धक्का बसलाय. सईदच्या आईने त्या सर्व दहशतवाद्यांना फाशी देण्याची मागणी केली आहे. तर वडील म्हणाले त्या दहशतवाद्यांना मृत्यूदंड दिला पाहीजे. काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सईदच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पर्यटक निशाण्यावर होते. मात्र पर्यटक आपले पाहुणे आहेत. आणि त्यांना वाचवण्यासाठी सईद हुसेननं जीवाची बाजी लावली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहशतवादी आपत्याला काहीही करणार नाहीत, हे सईदला माहीत होतं. सईद त्या हल्ल्यातून सहज वाचला असता. तरीही तो दहशतवाद्यांना नडला आणि भिडला. एक साधा घोडेवाला त्या क्षणी भारतमातेचा सैनिक झाला आणि शहीद झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world