Fruit Salad Benefits And Side Effects: अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात फळे खाल्ल्याशिवाय होत नाही. काही लोक असे आहेत ज्यांना एका वेळी फक्त एकच फळ खायला आवडते, तर काहींना फ्रुट सॅलड खायला जास्त आवडते. पण वेगवेगळ्या प्रकृतीची (उष्ण किंवा थंड) फळे एकाच वेळी खाणे योग्य आहे का? याच प्रश्नाचे उत्तर देताना फोर्टिस हॉस्पिटल, गुरुग्राम येथील डायटेटिक्स विभागाच्या प्रमुख दीप्ती खाटुजा यांनी NDTVला सांगितले की, एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकृतीची फळे खाल्ली जाऊ शकतात, पण त्याचे प्रमाण आणि स्वतःच्या आरोग्याच्या वैद्यकीय स्थिती याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
वेगवेगळ्या प्रकृतीची फळे एकत्र खाऊ शकतात का?
बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, उष्ण आणि थंड प्रकृतीची फळे एकत्र खाऊ नये. पण डॉक्टर दिप्ती यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला कोणतीही विशेष वैद्यकीय समस्या नसेल, तर ते ही फळे एकत्र खाऊ शकतात. पण जर कोणाला पचनाचा त्रास, ॲलर्जी असेल किंवा कोणी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी आपल्या शारीरिक स्थितीनुसार फळांची निवड केली पाहिजे.
वजन कमी करणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
डॉक्टर दिप्ती खाटुजांनी पुढे सांगितले की, जर एखाद्याला वजन कमी करायचे असेल, तर फ्रुट सॅलड तयार करताना फळांच्या प्रमाणावर लक्ष देणे गरजेचे आहे. काही फळे नैसर्गिकरित्या जास्त गोड असतात आणि त्यांच्यात साखरेचे प्रमाण अधिक असते. अशा परिस्थितीत केळी, चिकू आणि इतर जास्त गोड फळांचे प्रमाण मर्यादित ठेवले जाऊ शकते. दुसरीकडे कमी गोड असणारी फळे जसे की कलिंगड, पपई, सफरचंद किंवा हंगामी फळे जास्त प्रमाणात वापर केला जाऊ शकतो; यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि गोड खाण्याची इच्छाही कमी होते.
हंगामी फळे खाणे गरजेचे आहे का?फ्रुट सॅलड तयार करताना हंगामी फळांचा समावेश करणे आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते. उन्हाळ्यात आंबा आणि कलिंगड यासारखी फळे शरीराला हायड्रेट (पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास) ठेवण्यास मदत करतात. तसेच अन्य ऋतूंमध्ये उपलब्ध असणारी ताजी फळे देखील आरोग्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
केळी खाल्ल्याने वजन वाढते का?
केळी खाल्ल्याने वजन वाढते, हा समज पूर्णपणे योग्य नाही; अशी माहिती डॉक्टरांनी NDTVला दिली. वजन वाढणे किंवा कमी होणे हे केवळ एखाद्या एका फळावर अवलंबून नसते, तर ते तुमच्या संपूर्ण आहार (Diet) आणि जीवनशैलीवर (Lifestyle) अवलंबून असते.
(नक्की वाचा : Summer Healthy Drink: जीवघेणा उन्हाळा! घराबाहेर पडण्यापूर्वी प्या आंबटगोड अमृतासमान पेय,आरोग्यासाठी ठरेल वरदान)
जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये समतोल राखला आणि रोज शारीरिक व्यायाम किंवा हालचाल केली तर दिवसातून एक केळे खाणे सामान्यतः कोणतीही समस्या निर्माण करत नाही. उलट केळी शरीराला ऊर्जा, पोटॅशियम आणि अनेक आवश्यक पोषक घटक पुरवते.
दिवसातून किती केळी खावी?
एक सामान्य निरोगी व्यक्ती आपल्या गरजेनुसार आणि शारीरिक हालचालींनुसार दिवसातून एक केळे सहज खाऊ शकते. जर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या जास्त सक्रिय (Active) असेल तर तिची शरीराची गरज वेगळी असू शकते.
Expert: दिप्ती खाटुजा, डायटेटिक्स विभागाच्या प्रमुख, फोर्टिस हॉस्पिटल गुरुग्राम
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world