
संजय तिवारी, गडचिरोली: माजी मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात एकला चलो रे चा नारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद दाखवून देण्याचा पवित्र घेतलेला असून आपण त्यावर ठाम असल्याचे आणि स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे बाबा आत्राम यांनी सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात काय निर्णय घ्यायचा ते तिन्ही पक्षांचे नेते मिळून घेतील. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात आणि विदर्भात राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा असेल तर आम्हाला आमची ताकद दाखवून द्यावी लागेल असे विधान आत्राम यांनी नागपुरात केले आहे. तसेच रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री होईल असा दावा देखील केला आहे.
काय म्हणालेत बाबा आत्राम?
'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जो काही निर्णय घ्यायचा ते तिन्ही पक्ष बसून निर्णय घेतील.परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये (गडचिरोली) परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्या दृष्टिकोनातून आम्हाला थोडे विचारच करून पुढे जावे लागेल. मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय झाले ते पाहिले आहे. या निवडणुकीत जास्त लोक इच्छुक आहेत उभे राहायला.उमेदवार आणि पक्षाला बळकट करायचे असेल तर चांगले उमेदवार देणं गरजेचे आहे," असे बाबा आत्राम म्हणालेत.
तसेच "जिल्हा परिषदेमध्ये काय करायचे ते महायुतीचे नेते ठरवतील. त्यानुसार खालच्या पातळीवर आम्ही विचार करू. मी तयारी केली आहे. मी स्वबळावर आहे. त्या दृष्टीने गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झंडा फडकेल. आमच्या बैठकीत मी बोललो. त्याच दृष्टिकोनावर मी ठाम आहे. पक्षाला जर विदर्भात मजबूत करायचे असेल विदर्भात, तर आम्हाला आमची ताकद दाखवणे गरजेचे आहे," असेही ते यावेळी म्हणालेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world