Alert from the Meteorological Department : भारतीय हवामान खात्याने २० एप्रिल २०२६ रोजी पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. या काळात वीज कोसळण्याती भीती असते. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आलं आहे.
नागरिकांनो अलर्ट राहा...
- विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विजेची चमक दिसताच तत्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
- झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे.
- मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये.
- निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.
- शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत.
- बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे.
- यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करावे.
- नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे.
प्रशासनासाठी उपाययोजना
- ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी.
- रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत.
- शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात.
- हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world