
मुंबई: भविष्यातील प्रकल्पांसाठी तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. कोकण रेल्वे महामंडळांदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले की, कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांच्या सहकार्याने झाली होती. मात्र कोकण रेल्वे महामंडळाला सतत तोटा सहन करावा लागत असून आवश्यक गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. चार राज्य एकत्रित येऊन हे महामंडळ तयार झालं होत. त्यातल्या केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनी विलिनीकरणास संमती दिली असून महाराष्ट्रानेही या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
तसेच दुहेरीकरण, भूस्खलन प्रतिबंधक उपाययोजना आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आवश्यक आहे, जी कोकण रेल्वे महामंडळाकडे शक्य नाही. त्यामुळे विलिनीकरणानंतर भारतीय रेल्वे अधिकृतपणे या कामांसाठी गुंतवणूक करेल. लाईनचे दुहेरीकरण, अपघात प्रतिबंधक उपाययोजना, स्टेशन सुधारणा आणि आधुनिकीकरण यांसारख्या महत्त्वाच्या कामांना गती मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नक्की वाचा- Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)
दरम्यान, विलिनीकरणानंतरही 'कोकण रेल्वे' हे नाव कायम राहील, यालाही केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावाला होकार दिला असून पुढील आवश्यक कारवाईसाठी केंद्र सरकारला कळवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world