मेहबुब शेख, रायगड
Raigad News: रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-मुरुड मार्गावरील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या नागाव परिसरात सकाळपासूनच बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली आहे. परिसरात अचानक बिबट्याचं दर्शन झाल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागावच्या विविध वाड्या-वस्त्यांमध्ये बिबट्या फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे.
बिबट्या काही नागरिकांच्या घरांमध्ये आणि परिसरातील बगिच्यांमध्येही फिरताना दिसला आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या बिबट्याने आतापर्यंत तीन नागरिकांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुकाने आणि शाळा बंद
बिबट्याच्या या वाढत्या दहशतीमुळे नागाव परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बिबट्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच, परिसरातील काही शाळाही बंद करून ठेवण्यात आल्या आहेत. पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने, विद्यार्थ्यांना शाळेबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडू नये.
(नक्की वाचा- IndiGo Flight Crisis: इंडिगोने ताटकळत बसलेल्या प्रवाशांना काय दिलं? 'सॉरी किट' ठरतंय चेष्टेचा विषय)
पोलीस आणि वन विभागाची मोहीम
बिबट्याला लवकरात लवकर पकडून जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वन विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याचा मागोवा घेऊन त्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याला पकडल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.
(नक्की वाचा- Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; वाचा अटी-शर्ती)
या घटनेमुळे नागाव परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना अत्यंत खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. बिबट्याला लवकर पकडण्यात यश येईल, अशी आशा वन विभाग व्यक्त करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world