
School Holiday because of heavy Rain : आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्याला तर पावसाने पुरतं झोडपून काढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. दरम्यान आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळांना सुट्टी (School Holiday) जाहीर करण्यात आली आहे.
आज 29 सप्टेंबरला पालघर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याभरात खूप पाऊस झालाय, आजही तुफान पावसाची शक्यता असल्याने शिक्षण विभागाकडून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पाऊस वाढण्याची शक्यता आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

आज कोणत्या जिल्ह्यांना तुफान पावसाचा इशारा?
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आज 29 सप्टेंबरला पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची अधून मधून रिपरिप सुरू आहे. सध्या रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक सुरळीत आहे.
जायकवाडी धरणातील विसर्गामुळे जालना जिल्ह्याला मोठा फटका
जायकवाडी विसर्गामुळे जालना जिल्ह्यात सुमारे 10,000 लोकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, यातील 6870 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. परतूर, अंबड, घनसावंगी येथील हे नागरिक आहेत. त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. 23 ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत. अनेक शेतकर्यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी हलवून त्यांना चारा देण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world