जाहिरात

Yavatmal Crime News: मुलगी पाहिली, लग्न ठरलं! पोह्याचा बहाणा अन् भलतंच घडलं

Yavatmal News: यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून २.५ लाखांना लुटणाऱ्या सिमरन पाटील टोळीला अटक केली आहे. या टोळीने नाशिकच्या एका शेतकऱ्याची फसवणूक केली होती.

Yavatmal Crime News: मुलगी पाहिली, लग्न ठरलं! पोह्याचा बहाणा अन् भलतंच घडलं

प्रतिक राठोड, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात लग्नाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या एका टोळीचा घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्वतःचे लग्न जमवण्याच्या बहाण्याने लाखो रुपये उकळून पसार होणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'सह तिच्या संपूर्ण कुटुंबाला आणि साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये सिमरन पाटील हिच्यासह तिची आई, भाऊ आणि दोन साथीदारांचा समावेश आहे. या टोळीने नाशिकच्या एका शेतकऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांना लुटले होते.

फसवणुकीचा असा रचला डाव

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील शेतकरी अविनाश कवडे यांचे लग्न जमवण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून संपर्क झाला होता. मध्यस्थाने घाटंजीच्या चोरंबा येथील सिमरन पाटील हिचा प्रस्ताव दिला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगून लग्नाचा सर्व खर्च मुलाने करावा, अशी अट मुलीच्या घरच्यांनी  घातली गेली. 

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

ठरल्याप्रमाणे कवडे कुटुंबीय 10 फेब्रुवारी 2026 रोजी चोरंबा येथे भेटीसाठी पोहोचले. प्रत्यक्ष भेटीत लग्न निश्चित होण्याआधीच आरोपींनी कवडे कुटुंबीयांकडे मोठ्या रकमेची मागणी केली. सुरुवातीला नकार दिल्यानंतरही दबाव वाढवून अखेर दोन लाख 50 हजार रुपये उकळण्यात आले. यातील दोन लाख रुपये चोरंबा येथीलच एका साथीदाराकडे, तर उर्वरित रक्कम मध्यस्थाकडे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोह्याचा बहाणा करून पसार

पैसे मिळताच ‘पोहे आणायला जातो' असे सांगून सिमरन, तिची आई आणि भाऊ स्कुटीवरून पसार झाले. पाठोपाठ त्यांचे इतर साथीदारही मोबाईल बंद करून पळून गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कवडे कुटुंबीयांनी येताच कवडे यांनी पोलिसांत धाव घेतली.

(नक्की वाचा-  Crime News: मैत्रिणीची हत्या अन् मृतदेहावर अत्याचार; 'आत्मा' बोलावण्यासाठी अघोरी कृत्य, भयंकर घटनाक्रम)

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

मुख्य आरोपी सिमरन पाटील ही सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला मारहाण करून त्याची दुचाकी हिसकावून नेल्याच्या प्रकरणात सिमरन आणि तिचा भाऊ आरोपी होते. त्या अपमानामुळे संबंधित शेतकऱ्याने 14 जून 2025 रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात तुरुंगातून जामिनावर बाहेर येताच तिने पुन्हा फसवणुकीचा धंदा सुरू केला.

पोलिसांनी सिमरन पाटील, आई आशा पाटील, भाऊ करण पाटील आणि पुसद येथील सुनील राठोड व माणिक पवार यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(3), 316(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com