जाहिरात

Pandharpur : पंढरपुरात विठ्ठलाच्या पुरणपोळीच्या नैवेद्याला विरोध, कारण काय? 300 वर्षे जुनी परंपरा नेमकी काय?

पंढरपुरात चैत्र एकादशीच्या निमित्ताने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. याच पुरणपोळीच्या नैवेद्यावरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे.

Pandharpur : पंढरपुरात विठ्ठलाच्या पुरणपोळीच्या नैवेद्याला विरोध, कारण काय? 300 वर्षे जुनी परंपरा नेमकी काय?

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Pandharpur News : पंढरपुरात चैत्र एकादशीच्या निमित्ताने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. याच पुरणपोळीच्या नैवेद्यावरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी  पुरणपोळीला विरोध करत भक्तांशी सुसंगत अशीच आहार व्यवस्था देवाची ही असावी असा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे पूर्वापार परंपरागत चालेल आलेला चैत्रे एकादशीच्या पुरणपोळीचा नैवेद्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.


विठ्ठल पाटील यांचं काय आहे म्हणणं?

हजारो वर्षे लाखो भाविक एकादशी करतात. एकादशीचं व्रत हे वारकरी संप्रदायातील मूळ भक्तीचं साधन आहे. मात्र पंढरपुरात चैत्र एकादशीला पुरळपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. मला याचं अत्यंत दु:ख वाटतंय. आता आम्हाला इतर लोक म्हणतील तुमचा पांडुरंग पुरणपोळी खातो तर तुम्ही निर्जल एकादशी कशी आणि का करता? पुरणातील कथा सांगून तुम्ही विठ्ठलाला नैवेद्य दाखवणार ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. याचा खुलासा ज्यांनी नैवेद्य दाखवला त्यांना करावा लागेल. जर चैत्र एकादशीला विठ्ठलाला नैवेद्य दाखवला असेल तर वर्षातील ही एकादशी माफ आहे का? असा त्याचा अर्थ निघतो. दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपवास सोडताना हा नैवेद्य दाखवायला हवा होता, असं विठ्ठल पाटील यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम बदलणार? कारण काय?

300 वर्षे जुनी काय आहे परंपरा?



चैत्र एकादशीच्या दिवशी शिखर शिंगणापूर येथे महादेव आणि पार्वतीचा विवाह सोहळा झाला. यावेळी देव देवता या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. प्रसंगी महादेवाच्या विवाहात विठ्ठलाने पुरणपोळी खाल्ली. त्यामुळे देवाच्या विवाहाची आठवण म्हणून आजही चैत्र एकादशीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा रूढ आहे. ही परंपरा साधारण 300 वर्षाहून अधिक काळापासून सुरू आहे.

विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय यांनी हम्पी येथे विठ्ठल मंदिर बांधले. यावेळी पंढरपुरातून विठ्ठलाची मूर्ती हम्पी येथे गेली. विठ्ठलाला परत आणण्यासाठी संत एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज हम्पी येथे गेले होते. हम्पी येथून विठ्ठलाची मूर्ती परत एकदा पंढरपूर येथे आणण्यात आली. यावेळी परत एकदा मूर्ती आणि विठ्ठल पंढरपुरात आले. चैत्र एकादशी दिवशी विठ्ठलाची स्थापना झाली. या आनंदात पुरणपोळीचा महानैवेद्य शेकडो वर्षापासून दाखवला जातो.

वरील दोन आख्यायिकांच्या आधारे पुरणपोळीचा नैवेद्य एकादशी दिवशी विठ्ठल आज दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षापासून आजही अविरत सुरू आहे. याबाबत परंपरागत वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी यांनी कधीही आजपर्यंत विरोध किंवा वादादित प्रश्न उपस्थित केले नव्हते. पहिल्यांदाच वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी याबाबतचे प्रश्न पुढे आणले आहेत

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com