
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : आज अभूतपूर्व गर्दीत ठाकरेंचा विजयी मेळावा वरळीतील डोममध्ये आयोजित करण्यात आला. तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र आले. शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या मेळाव्याची सुरुवात राज ठाकरे यांच्या भाषणापासून झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले.
शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने जीआर मागे घेतला. यावर राज ठाकरे म्हणाले, खरंतर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी (Marathi Language Controversy) माणूस सर्वबाजूने कसा एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभे राहीले असते. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. हा मिळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता.
राज ठाकरे पुढे म्हणाले, मी मागे एका मुलाखतीत म्हटले होते की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षानंतर उद्धव आणि मी एका व्यासपीठावर येतोय. जे माननीय बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीसांना जमले.
कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. महाराष्ट्राकडे कोणीही वेड्यावाकड्या नजरेने पाहायचे नाही. हे सगळं अचानक कुठून आले हे कळालेच नाही. कशासाठी हिंदी ? कोणासाठी हिंदी ? लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती करताय? कोणाला काही विचारायचे नाही, आमची सत्ता आहे, बहुमत आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर.
दादा भुसेंना सांगितलं की तुम्ही काय सांगताय ते ऐकू, मात्र तुमचे ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र हे केंद्र आणि राज्यातील समन्वयासाठी आणले होते. केंद्रीय शिक्षण धोरणातही हिंदी सक्तीचा विषय नाही. महाराष्ट्रात त्यांनी प्रयोग करून पाहीले. दक्षिणेतील राज्य यांना हिंग लावून विचारत नाही. महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल, त्याशिवाय का माघार घेतली ?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world