शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli News : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी शंभर टक्के मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक टक्के मिळविणाऱ्यांशिवाय अनेक विद्यार्थी काठावरही पास झाले आहेत. कित्येक विद्यार्थी ३५ टक्के मार्क मिळवून पास झाले आहेत. तसं पाहता ३५ टक्के म्हणजे काठावर पास होणं, मात्र सांगलीत ३५ टक्के मार्क पडलेल्या मित्रासाठी थेट बॅनरबाजी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
नाद केला पण वाया नाय गेला...!
सांगलीत सध्या गजू भाईची मोठी चर्चा सुरू आहे. ३५ टक्के पडले अन गजू सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. पुढे भविष्य काय? ही चर्चा न होता 35 टक्केच्या चर्चेला उधाण आलं आहे. हा प्रसंग थोडक्यात चमत्कारिक वाटेल. दरवर्षी कित्येक विद्यार्थ्यांना ३५ टक्के मार्क म्हणजे सर्व विषयात ३५ मार्क पडतात. यंदा तर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात गजू भाईला सर्वच विषय 35 टक्के गुण मिळाले. या 35 टक्के गुणावर सुरज मात्र पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला आहे. कसा का असेना पास झाला, यात आई-वडील समाधानी आहेत. मात्र सुरजच्या मित्रमंडळींचा आनंदा गगनात मावेना झाला आहे. सुरज भावाने पराक्रम केला अशा आनंदात गावात बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर गजू भाईला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. नाद केला पण वाया नाय गेला, असंही या बॅनरवर लिहिलं आहे.
दहावीचा निकाल लागला अन् गजू भाई झाला फेमस...
सुरज भावाने नाद केला पण वाया नाही गेला. कारण या भाईची कथाही तशीच आहे. चिरंजीव सुरज उर्फ गजू भाई साळुंखे याने दहावीमध्ये ३५ टक्के गुण मिळवले आहेत. सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर तालुक्यातील कमळापूर गावातील या गजूभाईची चर्चा या काठावरच्या यशामुळे सर्वत्र रंगू लागली आहे. मग काय गावात बॅनर लागले. गजू भाईच स्वागतही करण्यात आलं. निकाल कळताच काही क्षणातच कमळापूरचा गजूभाई सर्वत्र फेमस झाला आणि गजू भाईला शुभेच्छा द्यायला मित्र परिवार आणि गावकऱ्यांनी त्याच्या घरी मोठी गर्दी केली होती. या गजू भावाला मराठीत 35, हिंदीत 35, इंग्रजीत 35, गणितात 35, विज्ञानामध्येही 35 आणि समाजशास्त्रामध्येही 35 गूण मिळाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world