
नागपूर: लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपच्या मदतीसाठी मतचोरी केली, असा थेट आरोप राहुल गांधींनी केला आहे. याबाबतचे कर्नाटकमधील मतदारसंघाचा दाखल देत त्यांनी थेट पुरावाही दाखवला. मात्र राहुल गांधींच्या या आरोपांवर निवडणूक आयोग काही थेट उत्तर देत नसल्याचे दिसत आहे. याबाबतच आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
नागपुरमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, "दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस घेतली त्याला मी हजर होतो. राहुल गांधी यांनी अतिशय कष्ट करुन, सखोल अभ्यास करुन त्या गोष्टी मांडल्या. त्यामध्ये काही गोष्टी समोर आल्या. एका घरात एक व्यक्ती राहत असताना ४० जणांनी मतदान केल्याचे दाखवले. आता निवडणुकीत आयोगाने त्यामध्ये लक्ष घालायचे ठरवलेलं दिसत आहे."
यावेळी बोलताना शरद पवार यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांबाबत एक सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी माझ्याकडे दोन लोकं आले होते. त्यांनी 288 पैकी 160 जागा जिंकून देऊ असा विश्वास दिला होता. मात्र, मी त्यांना फार गंभीरतेने घेतले नव्हते. त्या दोघांची गाठ मी राहुल गांधींशी घालून दिली मात्र यात आपण पडायला नको असा आपला आणि राहुल गांधींचा निर्णय होता," असा धक्कादायक खुलासा शरद पवार यांनी केला आहे.
Supriya Sule: उद्धव ठाकरे दिल्लीत आणि सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट! कारण काय?
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की "निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्र देण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. राहुल गांधी यांनी सांगितले की मी संसदेत सदस्य होताना शपथ घेतली आहे. त्यामुळे वेगळी शपथ घेण्याची गरज नाही. असा आग्रह जर निवडणूक आयोग करत असेल तर ते योग्य नाही, असं माझे मत आहे,"
"राहुल गांधींनी दाखवलेल्या मुद्द्यांवर सखोल जाण्याची गरज आहे. संसदीय लोकशाही पद्धतीवर लोकांमध्ये शंका निर्माण होणे योग्य नाही. याची योग्य चौकशी झाली पाहिजे. दुध का दुध, पानी का पाणी झालं पाहिजे. असं शरद पवार म्हणाले. तसेच राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला आहे. मगं भाजप किंवा मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडायला पुढे येण्याचे कारण काय?" असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही सुनावले.
दरम्यान, "आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे. नसेल तर सत्य पुढे यायला पाहिजे. यासाठी सोमवारी संसदेचे सर्व सहकाऱ्यांचा मोर्चा सोमवारी निवडणूक आयोगावर निघणार आहे," अशी माहितीही शरद पवार यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world