
गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणारे एसटी महामंडळ नफ्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात 31 विभागांपैकी 20 विभागांनी नफा कमवला आहे. ऑगस्च महिन्यात एसटी महामंडळाला 16 कोटी 86 लाख, 61 हजार रुपये इतका नफा झालाय. तब्बल 9 वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात आल्याची माहिती महामंडळातर्फे देण्यात आली आहे. या निमित्ताने एसटी महामंडळाचे कौतुक करण्यात आले असून महामंडळाला सतत फायद्यासाठी ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हे ही वाचा : भरघोस पगारवाढ ते कॅशलेस मेडिकल विमा, कर्मचाऱ्यांना संपानंतर मिळाल्या 5 मोठ्या गोष्टी
दोन वर्ष कोरोना महामारी, जवळपास 2 महिने चाललेला कर्मचऱ्यांचा संप यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावली होती. एसटी बंद करावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मे 2022 पासून एसटीची चाके पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात झाली होती. मधल्या काळात एसटीचा प्रवासी हा एसटीपासून दुरावला होता. त्याला पुन्हा एसटीकडे वळविणे हे एक मोठे आव्हान होते. एसटीकडे प्रवासी पुन्हा वळावेत या उद्देशाने 75 वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50 टक्के सवलत या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. या योजनांमुळे प्रवासी संख्या लक्षणीयरित्या वाढली असून सोबतच उत्पन्नातही वाढ झाली आहे. सध्या सरासरी 54 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.
हे ही वाचा : Aadhaar Card या पद्धतीनं घरीच करा मोफत अपडेट, उशीर केलात तर होईल खर्च !
एसटीला फायद्यात आणण्यासाठी प्रशासनाने तोट्यातील मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या प्रवासी जास्त असलेल्या मार्गांवर वळवण्यात आल्या. यासोबतच नादुरुस्त बसेसचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात आले. चालकांना मार्गदर्शन करत डिझेलच्या बसेसचे मायलेज वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या सगळ्याचा परिणाम म्हणून महामंडळ नफ्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world