सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. कुणी जिल्हा परिषदेसाठी तर कुणी पंचायत समितीसाठी इच्छुक आहे. काहींना नगराध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. अशात इच्छुक मोर्चे बांधणी करत आहेत. उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यात ते निवडणुका कशा जिंकायच्या असतात याचेच मार्गदर्शन आपल्या कार्यकर्त्यांना करत आहेत. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोळंके कार्यकर्त्यांना सांगितात, तुम्ही माझी विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे. शेवटच्या दोन दिवसांत काय करावं लागतं, कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडा कापावा लागतो, कोणाला बकरं द्यावं लागतं, आणि कोणाला लक्ष्मीचं दर्शन घडवावं लागतं. यामध्ये तुम्ही एक्सपर्ट बनलेले आहात. माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवलेल्या आहेत. त्यामुळे जो अनुभव तुम्ही घेतलेला आहे, तोच अनुभव येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वापरायचा आहे, असा सल्लाच ते आपल्या कार्यकर्त्यांना देताना या व्हिडीओत देताना दिसत आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांचे हे खळबळजनक विधान चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, इच्छुकांनी उमेदवारी मिळवताना आपल्याकडे काय दारूगोळा आहे याची माहिती देणंही गरजेचं आहे. पुढचा माणूस शंभर रुपये खर्च करणार असेल, तर आपणही शंभर रुपये खर्च केले पाहिजेत, असंही सोळंके यांनी म्हटले आहे. त्यामुळे तुमच्याकडे दारूगोळा ठेवा, गोळ्या ही घालाव्या लागतात असं ही ते यावेळी सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सोळंके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ आमदार आहेत. त्यांनी मंत्रिपदही भूषवलं आहे. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चात असतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world