Pooja More Press Conference : पुणे महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले असतानाच शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीत निवडून येण्यासाठी भाजपच्या अनेक उमेदवारांनी कंबर कसली आहे. भाजपने प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे यांना उमेदवारी घोषित केली होती.परंतु, त्यानंतर कार्यकर्त्यांनी या उमेदवारीवरून टीकेची झोड उठवली आणि पक्षाच्या नेत्यांना धारेवर धरलं. इतकच नव्हे तर सोशल मीडियावरही टीका-टिप्पणीचं रान उठलं होतं. भाजप कार्यकर्त्यांनी पूजा मोरे यांना प्रचंड ट्रोल केलं. या ट्रोलिंगमुळे पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर पूजा मोरे यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली. "मी बिनलग्नाची मुलगी होते.राजकारण घाणेरडं आहे, असं म्हणतात.पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळजावर ठेवून मला राजकारणात घातलं.पण मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहिले", असं मोठं विधान करतानाच पूजा मोरे यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
नक्की वाचा: Who is Pooja Dhananjay Jadhav: कोण आहे पूजा धनंजय जाधव? ज्यांना उमेदवारी दिल्याने भाजपप्रेमी भडकले
पूजा मोरे पत्रकार परिषदेत रडल्या, नेमकं काय म्हणाल्या?
पूजा मोरे म्हणाल्या,आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. हे सर्व बोलत असताना मला मागील 10-12 वर्षांचा सगळा संघर्ष आठवतोय.मी बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातील गोधाकाठच्या अत्यंत छोट्या गावात जन्मलेली मुलगी होते.माझ्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाहीत. पण मी ज्या शेतकऱ्यांसाठी काम करत होते, त्यामुळे मला वयाच्या 21 व्या वर्षी पंयायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलं गेलं. मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या. कारण मी शेतकऱ्याच्या पोटची होते म्हणून..त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली. माझ्या वयातील सर्वच मुली असतील, ज्या वयात नटत असतात. त्या वयात मी हे सर्व बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवसापर्यंत मी आरशात सुद्धा पाहायची नाही.
"शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि.."
पूजा मोरे पुढे म्हणाल्या,पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि ऐन तारुण्यात माझ्यावर पाच गुन्हे दाखल झाले. खूप कमी वयात मला न्यायालयाची पायरी चढावी लागली. हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या आयुष्यात होत नाही. मी हे सर्व संघर्ष करत असताना अनेक कार्यकर्ते पाहिले की ज्यांना मोठं होता येत नाही.पदापर्यंत जाता येत नाही. निवडणुकीच्या यंत्रणांमध्ये काम करता येत नाही. पण मी नेहमीच महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं.माझ्या खूप कमी वयात मी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या.त्यावेळी माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे.त्यावेळी मी पोलीस स्टेशनच्या बाथरूमबाहेर दोन दोन ताप झोपलेली आहे.
"राजकारण घाणेरडं आहे, असं म्हणतात.पण.."
"न्यायालयात वकीलाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशात पैसे नसायचे. पण अशा परिस्थितीत त्यांचा आवाज बुलंद केला. मी बिनलग्नाची मुलगी होते.राजकारण घाणेरडं आहे, असं म्हणतात.पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीज ठेवून मला राजकारणात घातलं.पण मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहिले.छत्रपती संभाजी राजेंच्या आशिर्वादाने मराठा क्रांती मोर्चात आम्ही काम करत असताना संभाजी राजेंनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं.लग्नानंतर एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या कामासाठी बाहेर पडले आणि लोकांसाठी काम करायला लागले",असंही पूजा मोरे यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world