
राज्यातील सोशल मीडियावर सध्या एका गोष्टीची जोरदार चर्चा आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या ( Vanchit Bahujan Aghadi) ऑफिशयल ट्विटर हँडलवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) शिव्यांची लाखोली वाहणारं एक ट्विट करण्यात आलं होतं. हे ट्विट पाहून सर्वच गोंधळात पडले होते. नेमकं कोणत्या कारणामुळे आव्हाडांवर हा संताप व्यक्त करण्यात आला होता, हे बहुतेकांना समजले नाही. याबाबत नेमकं काय घडलं होतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी झाली सुरुवात?
या संपूर्ण प्रकरणाला बुधवारी रात्री (30 जुलै 2025) रोजी सुरुवात झाली. 'वंचित बहुजन आघाडी' च्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन जितेंद्र आव्हाडांवर टीका करणारं एक ट्विट बुधवारी रात्री करण्यात आलं. या ट्विटमध्ये आव्हाड यांना शिव्यांची लाखोली वाहण्यात आली होती.
तुमच्यावर अडचण येते त्यावेळी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडे 50 वेळा फोन करता. बाळासाहेबांना (प्रकाश आंबेडकर) मला वाचवण्यासाठी विनंती करता....आता तुम्हाला आंबेडकर नावाची ॲलर्जी झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

या ट्विटमधील भाषा पाहून अनेकांना धक्का बसला होता. हे अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे का? असा ही प्रश्न काही नेटीझन्सनी सोशल मीडियावर विचारला. पण, अकाऊंट हॅक झालं नसल्याचं काही वेळात स्पष्ट झाले.
रोहित पवारांचा प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्विट करत आक्षेपार्ह भाषेबद्दल नाराजी व्यक्त केली. 'सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेले योगदान महत्वाचे असून न्यायालयीन लढ्यातली त्यांची भूमिकाही अतुलनीय आहे. संविधानविरोधी विचारधारांना लोळवण्याच्या लढाईत आंबेडकर कुटुंब नेहमीच सर्वांना मार्गदर्शक राहिले असून या कुटुंबाबद्दल एक वेगळाच आदर आहे.
( नक्की वाचा : Pune Rave Party : 'माल पाहिजे का'? पोलिसांच्या तपासात खडसेंच्या जावयाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड )
काल वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेबांबद्दल वापरली गेलेली भाषा मात्र समर्थनीय नाही आणि ॲड. @Prksh_Ambedkar साहेबांना तसेच @Sujat_Ambedkar जी यांना देखील ती भाषा पटणार नाही. या भाषेचा आम्ही निषेध करतो. सुजात जी आपण अशाप्रकारे ट्विट करणाऱ्या व्यक्तीला समज द्याल, ही अपेक्षा! ' असं ट्विट रोहित पवारांनी केलं. त्यांनी या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांना टॅग केले होते.
सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेले योगदान महत्वाचे असून न्यायालयीन लढ्यातली त्यांची भूमिकाही अतुलनीय आहे. संविधानविरोधी विचारधारांना लोळवण्याच्या लढाईत आंबेडकर कुटुंब नेहमीच सर्वांना मार्गदर्शक राहिले असून या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 31, 2025
सुजात आंबेडकरांचं उत्तर
रोहित पवार यांच्या ट्विटला सुजात आंबेडकर यांनी ट्विट करतच उत्तर दिलंय. त्यामधून 'वंचित' चा आव्हाडांवर संताप का व्यक्त झाला हे कळत आहे. सुजात आंबेडकर यांनी या ट्विटमध्ये सुरुवातीलाच, 'हे ट्विट पक्षात अनेकांना आवडलेले नाही. पक्षांतर्गत याची दखल घेतली जाईलच.' असे सांगितले. त्याचबरोबर सोमानथ सुर्यवंशी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांचा क्रेडिट घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार नाही का? असा सवाल विचारला आहे.
सुजात आंबेडकर यांनी या ट्विटमध्ये रोहित पवार यांना टॅग करत लिहिलं आहे, ' हे ट्विट पक्षात अनेकांना आवडलेले नाही. पक्षांतर्गत याची दखल घेतली जाईलच.
पण, या निमित्ताने एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की, आंबेडकरवादी चळवळीचे यश हायजॅक करणे आणि त्यावर सरंजामवाद्यांनी राजकीय भाकर भाजणे हे किती काळ सहन करावे?
गेल्या अनेक वर्षाच्या आंबेडकरी चळवळीत बहुजनांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे आणि बहुजन आंबेडकरवादी भूमिका घेऊन उभे राहतात, हे आमचे यश आहे. तुमचे नेते राहुल गांधी हे परभणीला येतात आणि सोमनाथ सुर्यवंशीला दलित म्हणतात आणि आंबेडकरवादी चळवळीतील बहुजनांचा सहभाग पुसून काढतात.
( नक्की वाचा : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल )
आंबेडकरवादी चळवळीने सोमनाथ सुर्यवंशीसाठी मोठा लढा उभा केला. बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद खंडपीठात, सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. त्याहून महत्त्वाचे शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईला फडणवीस सरकारने, पोलिसांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आमिष दाखवले पण, त्या कशालाही जुमानल्या नाहीत. @NCPspeaks, @INCIndia यांचा क्रेडिट घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार नाही का?
आज हा राग एका ट्विटमधून व्यक्त झालाय. सरंजामवाद्यांची हीच भूमिका राहिली तर लोकांचा रोष याहून तीव्र होईल. जितेंद्र आव्हाड स्वतःची वाह वाह करणे ही शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईच्या संघर्षाचा आणि वंचितांच्या लढ्याचा अपमान आहे. आव्हाड यांची ही भूमिका तुम्हाला मान्य आहे का ? हीच तुमची आंबेडकरी चळवळीबाबत पक्षाची पॉलिसी आहे का? ' असं मत व्यक्त केलं आहे.
प्रिय @RRPSpeaks दादा
— Sujat Ambedkar (@Sujat_Ambedkar) July 31, 2025
हे ट्विट पक्षात अनेकांना आवडलेले नाही. पक्षांतर्गत याची दखल घेतली जाईलच.
पण, या निमित्ताने एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की, आंबेडकरवादी चळवळीचे यश हायजॅक करणे आणि त्यावर सरंजामवाद्यांनी राजकीय भाकर भाजणे हे किती काळ सहन करावे?
गेल्या अनेक वर्षाच्या आंबेडकरी… https://t.co/ZBSdZWjBpe
सुजात आंबेडकर यांच्या ट्विटमधून वंचितची भूमिका स्पष्ट झाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आव्हाड यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन हा सर्व संताप व्यक्त करण्यात आलाय, हे यामधून स्पष्ट झालं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world