
शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट आखण्यात आला होता. त्यासाठी सुपारी देण्यात आली होती. ही बाब ज्यावेळी समोर आली त्यावेळी सर्वच जण हादरून गेले. त्यात आपल्या हत्येचा कट रचला जात होता याची माहिती पोलिसांना आधीपासूनच होती असं किणीकर म्हणाले. पण याची कल्पना किणीकर यांना नव्हती. किणीकरांना याबाबत त्यांच्या कार्यकर्त्याकडून समजले. त्यानंतर त्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना ही माहिती मिळाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचला जात होता. याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार मागील 15 दिवसांपासून गुन्हे शाखेची या कट रचणाऱ्यांवर नजर होती. असा गौप्यस्फोट स्वतः आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीच केला आहे. आमदार बालाजी किणीकर यांची हत्या करण्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन लोकांना ताब्यात घेतलं आहे. अन्य दोन लोकांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तर काही जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आमदार बालाजी किणीकर यांना सर्वात आधी एका कार्यकर्त्याने याबाबत माहिती दिली. तेव्हा त्यांनी त्या कार्यकर्त्याला घेऊन थेट ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मात्र त्या ठिकाणी 'हा कट आता नव्हे, तर अनेक दिवसांपासून सुरू आहे. मागील 15 दिवसांपासून आम्ही या कट रचणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहोत', अशी माहिती पोलिसांनीच आपल्याला दिली, असं बालाजी किणीकर यांनी म्हटलं आहे. ही माहिती पोलिसांनी किणीकर यांना का दिली नाही? त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली का? या सारखे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य दिशेने सुरू असल्याचे किणीकर म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत. जे काही पुढे येईल, ते सर्वांना समजेलच, असं बालाजी किणीकर या निमित्ताने म्हणाले. अंबरनाथचा रक्तरंजित इतिहास पाहता एखाद्या कार्यकर्त्याचीही हत्या होऊ शकते, अशी भीती ही किणीकर यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ बंद ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world